|
|
|
‘खंजिरा’चे वार आणखी कुणावर होणार ?
|
|
|
|
|
मुंबई, ६ नोव्हेंबर / खास प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी वसंतदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नावारुपाला आणलेला ‘खंजीर’ अद्यापही धुमाकूळ घालीत असून आता या खंजिराने शिवसेनेला पुरते घायाळ केले आहे. विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली खंत ‘सामना’तील अग्रलेखाद्वारे प्रगट करताना मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला,
असे म्हटले होते. मात्र आपला या अग्रलेखाशी संबंध नाही, असे हात शिवसेनाप्रमुखांनी आता एका संतापाने झटकल्याने शिवसेनेत नवे वादळ उठल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुखांनी गुरुवारी शिवसेना भवनात नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुखांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार व नेते संजय राऊत यांना उद्देशून संबंधित अग्रलेख आपण लिहिलात का, अशी विचारणा केली. मात्र त्यावर राऊत यांनी नकारार्थी मान हलवली, असे वृत्त विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. या घटनाक्रमानंतर शिवसेनाप्रमुखांनी अशी विचारणा का केली असावी आणि मग ‘अग्रलेखाचा’ धनी नेमका कोण, याविषयी शिवसेनेत व राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मुळात सामनाच्या अग्रलेखातील भूमिका ही शिवसेनाप्रमुखांची म्हणजेच शिवसेनेची भूमिका असल्याचेच मानले जात असल्याने त्यांनी ही आपली भूमिका नाही, असा नकार का दिला असावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनाप्रमुखांनी अग्रलेखापासून हात झटकल्याने त्यांनी गेल्या ४४ वर्षांत असे संपूर्ण घुमजाव प्रथमच केल्याचेही सामोरे आले आहे. आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात शिवसेनाप्रमुखांनी कोणत्याही जबाबदारीपासून माघार घेतलेली नाही. बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर जेव्हा भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा या कृत्याशी काहीही संबंध नाही, असा ढोंगी पवित्रा घेतला होता तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मात्र जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, असे उद्गार काढले होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी आपल्या अग्रलेखापासून हात का झटकले असावेत, याविषयी तर्कवितर्क सुरु झाले आहेत. सामनाच्या वादग्रस्त अग्रलेखातील ‘खंजीर’ वाक्याचे समर्थन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर अचानक शिवसेनाप्रमुखांनी या अग्रलेखाविषयी अप्रत्यक्षपणे तीव्र नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील ही तीव्र धुसफूस वेगळ्या वळणावर जाणार, अशी चर्चा आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|