|
|
|
पडद्याआड रुसवे फुगवे सुरूच ; आज तिसरी घंटा
|
|
|
|
|
मुंबई, ६ नोव्हेंबर / खास प्रतिनिधी आधी मंत्रिमंडळातील संख्याबळाचा वाद, मग मंत्रीपदाचा वाद आणि आता विधानसभा अध्यक्षपदाचा वाद; असा घोळात घोळ आणि रुसवे-फुगवे पडद्याआड सुरू असतानाच उद्या सरकारस्थापनेच्या लांबलेल्या महानाटय़ाची तिसरी घंटा घणघणणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दिवसामागे दिवस लोटत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्यातच आघाडी घेत होते.
आता तिसरी घंटा होऊन पडदा उघडत असतानाच आघाडीतील कुरबुरी शेवटच्या क्षणीही कायम असल्याचेच दिसत आहे. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहील, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले असले तरी अध्यक्षपदाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत शेवटपर्यंत रुसवे-फुगवे सुरूच होते. सरकार स्थापण्याचा राज्यपालांकडे दावा करताना १७० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्व २० मंत्री उद्या शपथ घेणार असले तरी काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत घोळ घालण्याची परंपरा कायम होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला साधे बहुमत मिळाल्यानंतर तब्बल १६ दिवसाने सरकार स्थापण्याचा दावा करणारे पत्र काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे सादर केले. राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी आघाडीला पाचारण केले असून, उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी समारंभ होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १४४ सदस्य, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाजवादी पार्टीसह अपक्ष अशा २६ सदस्यांनी आघाडीला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील हे सुद्धा उपस्थित होते. मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत सुमारे दोन आठवडे वाद सुरू होता. शेवटी सर्व महत्त्वाची खाती कायम ठेवत राष्ट्रवादीने काँग्रेसला नमविले. असे असले तरी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा सुटलेला नाही, असे चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत २३ व २० मंत्र्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. आरोग्य वगळता राष्ट्रवादीकडे असलेली सर्व खाती तसेच अध्यक्षपद कायम ठेवण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी रात्री स्पष्ट केले होते. कोणतीही महत्त्वाची खाती न मिळाल्याने काँग्रेसने आता विधानसभा अध्यक्षपदावर दावा केला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर खात्यांचे वाटप करताना अध्यक्षपद राष्ट्रवादी कायम ठेवण्याचा निर्णय झाल्यावरही मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र पुन्हा अध्यक्षपदावर दावा केल्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये नाराजीची भावना आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|