|
पडद्याआड रुसवे फुगवे सुरूच ; आज तिसरी घंटा
|
|
|
|
मुंबई, ६ नोव्हेंबर / खास प्रतिनिधी आधी मंत्रिमंडळातील संख्याबळाचा वाद, मग मंत्रीपदाचा वाद आणि आता विधानसभा अध्यक्षपदाचा वाद; असा घोळात घोळ आणि रुसवे-फुगवे पडद्याआड सुरू असतानाच उद्या सरकारस्थापनेच्या लांबलेल्या महानाटय़ाची तिसरी घंटा घणघणणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दिवसामागे दिवस लोटत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्यातच आघाडी घेत होते.
आता तिसरी घंटा होऊन पडदा उघडत असतानाच आघाडीतील कुरबुरी शेवटच्या क्षणीही कायम असल्याचेच दिसत आहे. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहील, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले असले तरी अध्यक्षपदाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत शेवटपर्यंत रुसवे-फुगवे सुरूच होते. सरकार स्थापण्याचा राज्यपालांकडे दावा करताना १७० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्व २० मंत्री उद्या शपथ घेणार असले तरी काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत घोळ घालण्याची परंपरा कायम होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला साधे बहुमत मिळाल्यानंतर तब्बल १६ दिवसाने सरकार स्थापण्याचा दावा करणारे पत्र काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे सादर केले. राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी आघाडीला पाचारण केले असून, उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी समारंभ होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १४४ सदस्य, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाजवादी पार्टीसह अपक्ष अशा २६ सदस्यांनी आघाडीला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील हे सुद्धा उपस्थित होते. मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत सुमारे दोन आठवडे वाद सुरू होता. शेवटी सर्व महत्त्वाची खाती कायम ठेवत राष्ट्रवादीने काँग्रेसला नमविले. असे असले तरी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा सुटलेला नाही, असे चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत २३ व २० मंत्र्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. आरोग्य वगळता राष्ट्रवादीकडे असलेली सर्व खाती तसेच अध्यक्षपद कायम ठेवण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी रात्री स्पष्ट केले होते. कोणतीही महत्त्वाची खाती न मिळाल्याने काँग्रेसने आता विधानसभा अध्यक्षपदावर दावा केला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर खात्यांचे वाटप करताना अध्यक्षपद राष्ट्रवादी कायम ठेवण्याचा निर्णय झाल्यावरही मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र पुन्हा अध्यक्षपदावर दावा केल्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये नाराजीची भावना आहे.
|