|
|
|
जादा दराच्या ठेकेदारांना वीज सुधारणांचे काम
|
|
|
|
|
महावितरणला २५ कोटींचा फटका राजेंद्र जोशी ,कोल्हापूर, २८ नोव्हेंबर
भारतीय निविदा कायद्यानुसार निविदा पध्दतीमध्ये ठेकेदाराने तांत्रिक क्षमतेची कसोटी पूर्ण केल्यानंतर पात्र ठेकेदारांच्या दरपत्रकाच्या लिफाफ्यात सर्वात कमी बोली देणाऱ्या ठेकेदाराला काम देण्याची पध्दत आजपर्यंत अवलंबिण्यात येत असली तरी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने या पध्दतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे निदर्शनास आले आहे.
महावितरणने राज्यात वीज वितरण यंत्रणेत सुधारणा व वीजगळती रोखण्यासाठी हाती घेतलेल्या विविध कामांमध्ये सर्वात कमी बोली देणाऱ्या ठेकेदाराबरोबर सुमारे ८ ते ९ टक्के जादा दराने निविदा दाखल करणाऱ्या स्पर्धक ठेकेदारालाही तेच काम देण्याचा निर्णय घेतल्याने महावितरणला या निर्णयाचा सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ही रक्कम केवळ दोन पॅकेजेसपुरती मर्यादित आहे आणि मंडळाने एकूण ३३ पॅकेजेसच्या निविदा मागवल्या होत्या. यामुळे मंडळाची नवी पध्दत कायम राहिली तर संभाव्य तोटा किती असेल याची कल्पना येऊ शकेल. विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये मूलभूत सुधारणा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पायाभूत आराखडा योजना २ ए अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती हे प्रकरण बाहेर आले आहे. या योजनेअंतर्गत महावितरणने राज्यातील वेगवेगळ्या झोनमध्ये ३३ पॅकेजेससाठी निविदा प्रसारित केल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्या सहभागी झाल्या. या कंपन्यांनी दाखल केलेले तांत्रिक निविदेचे लिफाफे उघडल्यानंतर पात्र ठेकेदारांची यादी तयार करण्यात आली आणि अशा पात्र ठेकेदारांनी भरलेले दरपत्रकांचे लिफाफे उघडण्यात आले. निविदा कायद्यानुसार या प्रक्रियेत संबंधित कामासाठी सर्वात कमी बोली असणाऱ्या ठेकेदाराला काम देणे क्रमप्राप्त ठरते. तसेच जर एकापेक्षा अधिक ठेकेदारांची संबंधित कामांसाठी निवड करावयाची झाल्यास स्पर्धेतील ठेकेदारांना सर्वात कमी बोली देणाऱ्या ठेकेदाराच्या बोलीवर काम करण्याचे संमतीपत्र घेऊन त्याला काम अदा करण्याची पध्दत आहे. प्रत्यक्षात मात्र महावितरण कंपनीत एक नवीच पध्दत अवलंबिण्यात आली. या प्रक्रियेत काही ठेकेदारांनी निविदेतील अंदाजित रकमेपेक्षा जादा रक्कम भरली असतानाही त्यांना अंदाजित रकमेपेक्षा कमी बोली देणाऱ्या ठेकेदाराच्या बोलीशी बरोबरी करावयास न लावता नाममात्र टक्केवारी कमी करण्याच्या अटीवर काम देण्याचा निर्णय झाला. यामुळे एकाच कामासाठी दोन ठेकेदारांना दोन वेगळे दर अशी नवी पध्दत अस्तित्वात तर आलीच, पण जादा दरामुळे महावितरणच्या खिशाला सध्या तरी किमान २५ कोटी रुपयांची कात्री लागली आहे. निविदा प्रक्रियेत पॅकेज ८६ व ८७ साठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नजर टाकली तर याची पूर्ण कल्पना येऊ शकेल. पॅकेज ८६ साठी सर्वात कमी बोलीची निविदा अंदाजित रकमेपेक्षा साडे पाच टक्के कमी होती, तर या निविदेच्या स्पर्धेत दुसऱ्या ठेकेदाराची निविदा ही अंदाजित रक्कमेपेक्षा ५.१३ टक्के अधिक होती. इथे महावितरणने स्पर्धक ठेकेदाराला केवळ ०.२० टक्के दर कमी करण्याच्या बोलीवर म्हणजेच सर्वात कमी बोलीच्या ठेकेदारापेक्षा १०.४३ टक्के जादा दराने दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात महावितरणचा तोटा १४ कोटी ४२ लाखावर जातो. तसेच पॅकेज ८७ मध्ये अंदाजित रकमेपेक्षा ४ टक्के कमी बोली असणाऱ्या ठेकेदाराबरोबर अंदाजित रकमेपेक्षा ८.४८ टक्के जादा बोली असणाऱ्या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यवहारात महावितरणचा तोटा ८ कोटी ३३ लाखावर जातो. विशेष म्हणजे हा सारा खर्च ऊर्जा वित्तपुरवठा महामंडळ आणि ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाकडून कर्ज घेऊन केला जातो आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|