|
भाईंदरला रेल्वेच्या धडकेने चार ठार
|
|
|
|
ठाणे, २८ नोव्हेंबर/प्रतिनिधी पाच वर्षांपासून रखडलेल्या भाईंदर फाटा सबवेमुळे प्रवाशांना रोज रेल्वेमार्ग ओलांडण्याची कसरत करावी लागते. हा मार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार प्रवाशांच्या शुक्रवारी मध्यरात्री भरधाव मेलच्या धडकेने अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या.
त्या प्रवाशांची अद्याप ओळख पटली नसली तरी ते हिमालया कॅटर्समध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी आले होते. लग्न सराईत कॅटर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मजूर व कारागीर बाहेरून आणले जातात. असेच काही मजूर हिमालया कॅटर्सच्या मालकाने मुंबईतील चर्नीरोडवरील सीपी टँक परिसरातून भाईंदरमध्ये आणण्यात आले होते. शुक्रवारी काम आटोपल्यानंतर त्यापैकी चार मजूर हे भाईंदर फाटय़ावरून रेल्वेमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. समोरून येणाऱ्या मेलने त्यांना धडक दिली. त्यातच ते ठार झाले. धडक इतकी भयानक होती की त्यांचे मृतदेह ओळखणे कठीण बनले होते. अखेर कॅटर्सच्या मालकांने चौघांनाही ओळखले. मात्र त्यांची नावे त्यांना माहीत नसल्याने रेल्वे पोलिसांना नळबाजारात धाव घ्यावी लागली आहे.
|