मुखपृष्ठ >> लेख >> ‘बेगम बर्वे’विषयी.. - नाटय़प्रवासाचा लक्षणीय वेध
 


स्पर्धेचे नियम व अटी




‘बेगम बर्वे’विषयी.. - नाटय़प्रवासाचा लक्षणीय वेध Bookmark and Share Print E-mail
विनायक लिमये - बुधवार, २८ जुलै २०१०
एखादं नाटक गाजतं, त्याचे प्रयोग होतात, प्रयोगांचा विक्रम होतो, काही काळाने मग ते नाटक विस्मरणात जाते. पुन्हा कधी तरी त्या नाटकाचे पुनरुज्जीवन होते. मग पुन्हा त्या नाटकाची चर्चा होते, पण एखाद्या नाटकाचा संपूर्ण प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्यासंबंधीचे पुस्तकच हवे, पण असा प्रयोग क्वचितच होतो. हे भाग्य सतीश आळेकर यांच्या ‘बेगम बर्वे’ या नाटकाला लाभले आहे. एखाद्या नाटकाचा किती पद्धतीने व कसा विचार करता येतो ते स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
‘राजहंस’ प्रकाशनच्या वतीने नुकतेच ‘बेगम बर्वे’ विषयी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. रेखा इनामदार-साने यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या नाटकाला वीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने हे पुस्तक करण्यात आले आहे. या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे संपादक रेखा इनामदार-साने यांनी योग्य लेखक निवडून या नाटकाचा सविस्तर वेध घेतला आहे. या पुस्तकात जी तीन परिशिष्टे आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. पहिल्या परिशिष्टामध्ये या नाटकाची जन्मकथा श्री. आळेकर सांगतात. त्यानंतर दुसऱ्या परिशिष्टात व तिसऱ्या परिशिष्टात बेगम बर्वे या नाटकाचे कुठे प्रयोग झाले, कोणत्या भाषेत झाले याची तपशीलवार नोंद आपल्यासमोर येते. या पुस्तकात लेखक परिचय व नाटककाराचाही परिचय अत्यंत नेमकेपणाने दिला आहे. हा परिचय वाचल्यावर मग आपापल्या क्षेत्रात मान्यवर असलेल्या मंडळींनी या नाटकाविषयी किती गांभीर्याने लिहिले आहे व त्याचा व्यासंग किती आहे ते लक्षात येते.
‘बेगम बर्वे’ विषयी हे पुस्तक केवळ या नाटकाची समीक्षा करत नाही, या नाटकाचा सर्वागीण अभ्यास या पुस्तकातून झाला आहे. विलास खोले, विजय तापस, अविनाश सप्रे आणि राजीव नाईक व ऊर्मिला भिर्डीकर या पाच अभ्यासकांनी अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून या गटात लिहिलेल्या लेखात या नाटकाचा भाषा, आशय आणि परिणाम या मुद्दय़ांवर विचार करण्यात आला आहे.
या नाटकाचे परीक्षण करताना प्रा. अविनाश सप्रे यांनी यथातथ्यवाद आणि वास्तववाद यातील फरक सांगून या नाटकाचे वेगळेपण स्पष्ट केले आहे. यासंदर्भात ते म्हणतात, ‘बेगम बर्वे’ चा विचार सामाजिक परिप्रेक्ष्यात करताना जे वास्तव समोर येते, त्यासंदर्भात मराठीमध्ये प्रस्थापित असलेल्या एका घोटाळ्याचा विचारही येथे जाता जाता लक्षात आणून द्यावासा वाटतो. मराठी नाटक/ कादंबऱ्यांतून प्रामुख्याने प्रकट होणाऱ्या ज्या अनुभवाला आपण ‘वास्तववादी’ म्हणतो तो वस्तुत: ‘यथातथ्यवादी’ (नॅचरॅलिस्टिक) स्वरूपाचा असतो. या दोन्हींमध्ये फरक आहे. ‘यथातथ्यवादा’मध्ये अनुभव आहे तसा (पृष्ठस्तरीय व दृष्यस्वरूपातला) दाखवला जातो, तर वास्तववाद त्याच्या पुढे जाऊन या या अनुभवाचा सर्जनशील ‘अन्वयार्थ’ लावीत असतो. आळेकरांचे बेगम बर्वे हे या अर्थाने वास्तववादी नाटक आहे आणि त्यात वास्तवाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणतात, ‘बेगम बर्वे हे प्रश्नांना धाडसाने हात घालणारे, प्रतिष्ठित नाटकांची आणि नाटय़भिरुचीची सृजनशील समीक्षा करणारे ‘नाटकावरचे नाटक’ आहे आणि म्हणून आजच्या परिभाषेत सांगायचे तर ते एक EIY meta-ficition आहे, ही एक संस्कृती समीक्षा आहे.
या पुस्तकात असलेले एकूण दहा लेख या नाटकाची प्रत्येक बाजूने चर्चा करतात. ‘बेगम बर्वे- रंगकर्मीच्या दृष्टिकोनातून’ या विभागात राजीव परांजपे, मकरंद साठे, सचिन कुंडलकर आणि चंद्रशेखर फणसळकर व प्रवीण भोळे यांचे लेख आहेत. राजीव परांजपे यांनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. या वेगळ्या प्रकृतीच्या नाटकाला संगीत देताना त्यांनी काय विचार केला होता ते
समजते. इंग्रजी भाषेतील प्रयोगासाठीही त्यांनी संगीत दिले आहे, त्यासाठी काय केले तेही कळते. या नाटकाच्या प्रयोगाचा तपशील केवळ राजीव परांजपे यांच्या काटेकोर नोंदीमुळेच उपलब्ध झाला आहे. नाटकाशी संबंधित रंगकर्मीने अशी नोंद ठेवण्याचे उदाहरण तसे दुर्मिळच. आपल्याकडे जतन करण्याची, इतिहास नोंदवण्याची पद्धत नाही त्याला परांजपे अपवाद आहेत, त्यांचे मोलाचे काम या नाटकाचा इतिहास नोंदवताना मोलाचे ठरले आहे, यात शंका नाही.
चित्रपट व नाटय़ दिग्दर्शकांपैकी तरुण दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी तसेच प्रवीण भोळे यांनी आपल्या लेखात दिग्दर्शकाच्या नजरेतून या नाटकाचा वेध घेतला आहे. ‘बेगम बर्वे’ हे नाटक वयाच्या तिसाव्या वर्षी आळेकरांनी लिहिले. या नाटकाचा पहिला प्रयोग १९ मार्च १९७९ ला थिएटर अॅकॅडमी या पुण्यातील नामांकित संस्थेने दिल्लीत केला.
‘बेगम बर्वे’ या नाटकावरील या पुस्तकात संपादिका रेखा इनामदार-साने यांनी दोन पानाचे मनोगत लिहिले आहे त्यातून पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया व हेतू आणि पुस्तकासाठी कुणाचे कसे सहकार्य मिळते याचा तपशील कळतो. त्यानंतर ‘विषयप्रवेश’ या भागात रेखा इनामदार-साने आपल्या १७ पानांच्या या लेखातून पुस्तकात काय आहे ते तर सांगतातच, पण या नाटकासंबंधीची मार्मिक निरीक्षणेही नोंदवतात. मुळात हे पुस्तक सहज घेतले चाळले, वाचले अशा गटातील नाही. रंगभूमीबद्दल भाबडी सहानुभूती किंवा प्रेम असणाऱ्यांपेक्षा ज्यांना रंगभूमी समजून घ्यायची, विशिष्ठ स्वररूपाचा अभ्यास करायचा आहे अशा मंडळींसाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक मनोरंजनपर नाही. या पुस्तकात ज्या मान्यवरांनी लेख लिहिले आहेत त्यामुळे नाटकांची व संबंधित काळाची माहिती तर मिळतेच, पण संपादक रेखा इनामदार-साने यांचा ‘विषयप्रवेश’ हा लेख नाटकाकडे पाहण्याची दृष्टी देतो, ज्यांनी हे नाटक पाहिलेले नाही त्यंनाही हा लेख वाचल्यावर या पुस्तकाचा आणि नाटकाचा आवाका लक्षात येतो. खूप वर्षांपूर्वी ‘कर्ण खरा कोण होता’ हे दाजी पणशीकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्याला धो. विं. देशपांडे यांची प्रस्तावना होती. पुस्तकाइतकीच ती प्रस्तावनाही अप्रतिम होती. इथेही या पुस्तकात तसेच झाले आहे. विषयप्रवेश आणि दहा लेख म्हणजे वाचकाला नजरबंदीचा खेळ पाहिल्याची आणि मेंदूला प्रचंड चालना देणारी गोष्ट आहे.बेगम बर्वे या नाटकासंबंधीचे हे पुस्तक म्हणजे नाटय़शास्त्राच्या अभ्यासकांना एक संदर्भग्रंथ आहे, यात शंकाच नाही. त्याचबरोबर आम्ही नाटक बघतो किंवा आम्हाला नाटकाची आवड असे नुसते सांगणाऱ्या मंडळींनी देखील हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. कारण, नाटक कसे बघावे आणि नाटकाचा आशय कसा शोधायचा असतो त्याबद्दलचे मार्गदर्शन येथे अत्यंत सोप्या शब्दात मात्र तरीही जो आशय सांगण्याचा टोकदारपणा आहे त्याला धक्का न लागता समोर येते. सध्याच्या रिअॅलिटी शोच्या जमान्यात आयडिया सारेगमपच्या विविध भागांमध्ये स्पर्धकांना संगीत क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मंडळी ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन त्या स्पर्धकाला चांगला गायक होण्यासाठी उपयुक्त तर ठरतेच पण त्याचबरोबर हा कार्यक्रम पाहणाऱ्या रसिकांना कानसेन होण्यासाठी देखील उपयोगी पडते. ‘राजहंस’ चे हे पुस्तक असेच केवळ नाटकाची आवड नव्हे तर नाटय़अभिरुची कशी असायला हवी, यासंदर्भात चपखल मार्गदर्शन करते.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.