राज्यात करोनाबरोबरच वाढत्या वीजबिलाच्या मुद्यांनं उग्र रुप घेतलं आहे. करोना काळात वाढीव वीजबिलं आल्यानं नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढीव वीजबिलाच्या प्रश्नानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यावर उतरत आवाज उठवला असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारविरोधात गर्जना केली आहे. “या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावून लूट सुरू केली आहे,” अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.

वाढीव वीजबिलांच्या मुद्यावरून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनं केलं. यावेळी राज ठाकरेंनी लिहिलेलं निवेदन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनात राज ठाकरे यांनी सरकारच्या वाढीव वीजबिलांसंदर्भातील भूमिकेचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज्य सरकारचे जिल्हापातळीवरचे सर्वोच्च प्रतिनिधी या नात्याने माझे महाराष्ट्र सैनिक महाविकास आघाडी सरकारला आपणामार्फत हे निवेदन देत आहेत. करोनाच्या काळात माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सरकारचे डोळे उघडावे यासाठी रस्त्यावर उतरून, मोर्चा काढून संघर्ष करायला लागावा, है दुर्दैवी आहे. पण सरकारला आर्जंवांची भाषा समजत नाही. त्यामुळे आता मोर्च्याच्या भाषेत समजावयाची वेळ आमच्यावर आली आहे.”

आणखी वाचा- खळखट्याक नको असं राज ठाकरेंनी सांगितलेलं असतानाही…; मनसेच्या आंदोलनाला लागलं गालबोट

“एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं. व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेलं अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना, महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येत तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खासगी आस्थापनांची कार्यालयं बंद होती. पण तरीही त्यांना भरभक्कम वीज देयकं पाठवली. पूर्वी परकीय राजवटीत जिझिया कर लावला जायचा, या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरू केली,” असं टीकास्त्र राज ठाकरे यांनी डागलं आहे.

आणखी वाचा- वाढीव वीजबिलावरुन राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन, म्हणाले…

“या विषयावर माझ्या पक्षातील नेत्यांनी सन्मानीय ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे जनतेचं गाऱ्हाणं मांडलं. जनतेला या कठीण परिस्थितीत लुटू नका, असं आर्जव केलं. पण या विषयावर काहीतरी सकारात्मक पाऊल सरकार उचलेल असं नेहमीच थातुरमातुर उत्तर त्यांनी दिलं. या पलिकडे काहीच घडलं नाही. पुढे आम्ही राज्यपालांपर्यंत देखील हा नेला. त्यांना या विषयातील गांभीर्य जाणवत होतं. पण त्यांनी देखील या विषयात सरकार काही करत नाही, याचं दुःख व्यक्त केलं. त्यात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ अशी भाषा करणारे ऊर्जामंत्री घुमजाव करून वीज देयक भरलंच पाहिजे आणि कोणतीही सवलत मिळणार नाही, अशी भाषा बोलू लागले आणि आमचा संयम सुटला. करोनाचा काळ कठीण आहे हे लक्षात घेऊन आम्ही सरकारच्या बाजूने ठाम उभे राहिलो. पण… हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल, तर मग आम्हाला पण जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. ही असली मनमानी आम्ही खपवून घेणार नाही.”

आणखी वाचा- “तोडफोड, गोंधळ…” राज्यभरात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिला सक्त आदेश

“आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे, काही झालं तरी ही वाढीव वीज देयकं भरू नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा. करोनाचं संकट अजून ओसरलेलं नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील. सरकारच्या निर्बंधांचं पालन सगळेच कसोशीनं करायचा प्रयत्न करत आहेत पण म्हणून सरकारनं जनतेला गृहीत धरू नये. आम्हाला संघर्ष जरी नवीन नसला तरी ही वेळ संघर्षाची नाही, याचं भान सरकारनं देखील बाळगावं आणि उगाच वाढीव वीजदेयकं पाठवून संघर्ष करू नये. या विषयावर समंजस भूमिका घेत, वीजदेयकांत सवलत देत नागरिकांना दिलासा द्यावा, हीच सरकारला विनंती,” असं आवाहन राज ठाकरे यांनी महाविकास सरकारला केलं आहे.