एक जागतिक दर्जाचे शहर अशी मुंबईची ओळख जगभरात आहे. भारताची आíथक राजधानी असलेल्या मुंबईतील व्यापारउदीमावर सहज नजर टाकली असता या शहराचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान किती मोठे आहे, हे सहज लक्षात येईल. पण जागतिक दर्जाचे शहर बनण्यासाठी केवळ याच गोष्टी असून भागत नाही. जगभरातील मोठमोठय़ा आणि नावाजलेल्या शहरांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या शहरांमधील पायाभूत सुविधांचा विकास! त्या तुलनेत मुंबईतील पायाभूत सुविधा अजूनही पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाली तीच मुळी मुंबईसह आसपासच्या मोठय़ा प्रदेशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून!

सुरुवातीच्या काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून शहर तसेच महानगर प्रदेशात रस्त्यांचे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणले गेले. त्यामुळे मुंबई परिसरातील वाहतूक अधिक वेगवान झाली. हळूहळू असलेले रस्ते मोठे करण्याबरोबरच एमएमआरडीएने नवनवीन रस्ते बांधण्यासही सुरुवात केली. यातील महत्त्वाचे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले काही रस्ते म्हणजे जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोड, सांताक्रूझ-चेंबूर िलक रोड, पूर्व मुक्तमार्ग आणि सहार उन्नत मार्ग! पण पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा प्रवास एवढय़ावरच न थांबवता एमएमआरडीएने शहरात मेट्रो प्रकल्पांचे जाळे तयार करण्याचा विडाही उचलला आहे. यातील सर्वात पहिला मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वातून वर्सोवा- अंधेरी- सीप्झ यांदरम्यान पूर्ण करण्यात आला. २०१४ रोजी लोकांसाठी खुल्या झालेल्या या मेट्रो मार्गावर आज दर दिवशी तब्बल तीन लाख प्रवासी प्रवास करतात.

या प्रकल्पाप्रमाणेच एमएमआरडीएने आणखी ९ मेट्रो प्रकल्पांचे नियोजन केले असून त्यापकी तीन प्रकल्पांचे काम सुरूही झाले आहे. त्यापकी एक म्हणजेच कुलाबा- वांद्रे- सीप्झ हा मेट्रो-३ प्रकल्प मुंबई मेट्रोरेल महामंडळातर्फे राबवला जात आहे. तसेच आणखी दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया चालू झाली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पांच्या कामांनाही सुरुवात होणार आहे.

फायदे काय?

सध्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठी समस्या वाहतुकीची आहे. सध्या या प्रदेशातील लोकांना रस्ते आणि रेल्वे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पर्यायांची क्षमता पुरेपूर वापरली जात असून मेट्रोचा पर्याय शहरासाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे. सध्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून ७५ ते ८० लाख प्रवासी दर दिवशी प्रवास करतात. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या दर दिवशीच्या एकूण फेऱ्यांचा विचार केल्यास दोन्ही मार्गावर मिळून सुमारे ३००० फेऱ्या दर दिवशी चालवल्या जातात. म्हणजेच प्रत्येक फेरीत सरासरी अडीच हजार प्रवासी प्रवास करतात. एक गाडी अडीच हजार प्रवासी वाहून नेण्यासाठी सक्षम असली, तरी प्रत्यक्षात गर्दीच्या वेळी एका गाडीत ४५०० ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या सेवेवरील ताण वाढतोच, पण प्रवासी सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी गाडय़ांचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही वाढली आहे.

या सर्वावर तोडगा म्हणून एमएमआरडीएने दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशनच्या मदतीने २००३ मध्ये बृहद् आराखडा तयार केला. या आराखडय़ाप्रमाणेच मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम सुरू असून आता एमएमआरडीएने हाती घेतलेले मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे २०१९ मध्ये तब्बल नऊ लाखांहून जास्त प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पाच मेट्रो मार्गाच्या बांधकामासाठी एकूण ६१२८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गामुळे पन्नास हजारांहून अधिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे हे मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर पडणारा ताण तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यावर सध्या खासगी गाडीतून प्रवास करणारेही मेट्रोचा अवलंब करण्याची शक्यता खूप जास्त असल्याने इंधनाची बचत आणि वायुप्रदूषणात घट हे दोन हेतू साध्य होतील.

आता मेट्रो प्रकल्पांविषयी थोडेसे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो- ७ मार्गावर एकूण १४  स्थानके असतील. ही सर्व स्थानके उन्नत असून त्यासाठी ६०२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१९ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे ४.७३ लाख प्रवासी प्रवास करतील, असे उद्दिष्ट आहे.

मेट्रो- २ ए हा प्रकल्प दहिसर पश्चिम ते डी. एन.नगर अंधेरी पश्चिम यादरम्यान असेल. या १८.५ किमीच्या मार्गावर १७ स्थानके असून सर्व स्थानके उन्नत असतील. ६४१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर २०२१ मध्ये ५.२९ लाख प्रवासी प्रवास करतील. याच प्रकल्पाचा पुढील टप्पा म्हणजे डी. एन.नगर अंधेरी ते मानखुर्द हा मेट्रो- २ बी प्रकल्प! २३.६४३  किमीच्या या प्रकल्पामध्ये २२ स्थानके असून ही स्थानकेदेखील उन्नत असतील. या प्रकल्पासाठी १०९८६ कोटी रुपयांचा खर्च होणार असून हा प्रकल्प २०१९ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या वेळी या मेट्रोद्वारे साडेसात लाख प्रवासी प्रवास करतील.

खऱ्या अर्थाने मुंबई महानगर प्रदेशात पोहोचणारा मेट्रो प्रकल्प अशी मेट्रो- ४ ची ओळख सांगता येईल. वडाळा ते कासारवडवली यादरम्यान असलेला हा ३२.३२ किमीचा प्रकल्प संपूर्णपणे उन्नत असेल. त्यासाठी १४५५९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो २०२१ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्या वेळी ८ लाखांपेक्षा जास्त प्रवासी या मार्गाचा अवलंब करणार आहेत.

या प्रकल्पांशिवाय ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो- ५, स्वामी समर्थनगर- जोगेश्वरी- कांजूरमार्ग- विक्रोळी मेट्रो- ६ या दोन प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व आणि वडाळा ते जीपीओ या दोन प्रकल्पांचा शक्यता अहवाल तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे.

भविष्यातील मुंबई ही खऱ्या अर्थाने ‘मेट्रो’ शहर बनणार आहे, यात वादच नाही. या मेट्रो प्रकल्पांबरोबरच मुंबई ट्रान्स हार्बर िलक रोड या शिवडी ते न्हावा शेवा यादरम्यानच्या मार्गाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. तसेच बीकेसी- पूर्व द्रुतगती महामार्ग, बीकेसी- वांद्रे- वरळी सागरी सेतू या दोन उड्डाणपुलांचे बांधकामही सुरू झाले असून नजीकच्या काळात शहरातील समस्या सोडवण्यासाठी हे मार्गही मोलाचे काम करणार आहेत.