शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पहिल्यांदाच जाहीररित्या स्वत:ची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा बोलून दाखविली. राज्यातील मतदारांनी  मला फक्त एकदा संधी द्यावी, त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाही उद्धव यांनी दिली. विधानसभा निवडणुकांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा शिवसेनेचाच असेल, असे उद्धव ठाकरे यांनी ‘आज तक’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. यावेळी आम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याशी बोलतोय का ? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमच्या तोंडात साखर पडो, असे सूचक वक्तव्य केले.
लोकांनी फक्त एकदा संधी देऊन बघावी, त्यांना तक्रार करण्याची मी कोणतीही संधी देणार नाही. मला मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत नाहीत. परंतु, तशी वेळ आलीच तर मी जबाबदारी झटकणारही नाही, असे उद्धव यांनी सांगितले.
जनतेला माझ्याविषयी विश्वास वाटत असेल, तर चांगलेच आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोण हवयं, हे जनताच ठरवेल, असे उद्धव यांनी म्हटले.