निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन चुलतभैयूंमध्ये दिलजमाई घडवून आणण्याच्या छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आणि त्यांचा सूत्रधार आहे बडय़ा नेत्यांचा राजकीय युवा गुरू. विशेष म्हणजे सत्ताधारी आघाडीतील एका नेत्याच्या घरातून या हालचालींची ‘तट’बंदी करण्यात येत आहे. मात्र त्याला अद्याप तरी दोन्ही बाजूंकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला गेला आहे. त्यांचा पंचवीस-तीस वर्षांचा संसार तुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काडीमोड झालाच तर पुढे कोणकोणते पर्याय असू शकतात, याची दोन्ही पक्षांकडून चाचपणी केली जात जात आहे. भाजपने मनसेशी हातमिळवणीची आशा सोडलेली नाही. दुसरीकडे शिवसेना-मनसेने एकत्र यावे, या चर्चेलाही अजून पूर्णविराम मिळालेला नाही. एकंदर सेना आणि भाजपसाठी मनसे हा पर्याय अजूनही खुला आहे, असे मानले जाते.
या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील काही बडय़ा नेत्यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका युवाबाबाने उद्धव व राज यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती मिळते. गेल्या महिनाभरात या रूबाबदार महाराजांनी दोन्ही नेत्यांच्या अनेकदा भेटी घेतल्याचे समजते. परंतु त्यांच्यात दिलजमाई होईल, असे कोणतेही संकेत अद्याप तरी मिळाले नसल्याचे सांगितले जाते. या बाबांच्या दिव्यदृष्टीसमोर मात्र आजही या भैयूभेटीची स्वप्ने तरळत आहेत. या वेळी आपण काहीही करुन सेना-मनसे युती घडवून आणणारच, असा दैवी विश्वास ते राजकीय क्षेत्राशी संबंधित काही व्यक्तींकडे व्यक्त करीत असल्याचे समजते. हे युवाबाबा मुंबईत आले की सत्ताधारी आघाडीतील माजी मंत्री असलेल्या एका नेत्याच्या घरी उतरतात. त्यामुळे सेना-मनसेची युती व्हावी, ही इच्छा त्या बाबांची आहे की त्यांच्या घडय़ाळाला कुणा बडय़ा नेत्याने चावी दिली आहे, अशी चमचमीत चर्चा सध्या सुरू आहे.