
भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.
पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.
भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.