येत्या पाच वर्षांत दुप्पट कोळसा उत्पादन करणे भारताला शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कोळसा व ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी येथे केले. भारताला स्वयंपूर्ण कोळसा उत्पादित देश बनविण्याचे ध्येय विशद करतानाच केंद्रीय मंत्र्यांनी २०१९ पर्यंत एक अब्ज टनहून अधिक कोळसा देशात उपलब्ध केला जाईल, अशी हमी दिली.
भारतात सध्या वर्षांला एकूण ५६.५० कोटी टन कोळसा उत्पादन होते. पैकी तब्बल ४९ कोटी टन एकटय़ा कोल इंडिया कंपनीमार्फत होते. विस्तारासाठी ही सार्वजनिक कंपनी कोळसा वाहतुकीकरिता आवश्यक असे नवे २५० साठवणूक साहित्य खरेदी करणार असून त्यासाठी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
भारत हा कोळसा उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण होण्याबरोबरच निर्यात देश म्हणूनही उदयास येण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न केले जाणार असून यासाठी अद्याप खुल्या न झालेल्या देशातील २०० हून कोळसा खाणी उपयोगात आणल्या जातील, असेही गोयल यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
देशातील ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळसा कायम आयातच करावा लागतो, हे चित्र बदलण्याची गरज प्रतिपादन करताना केंद्रीय मंत्र्यांनी देशातील ऊर्जा निर्मिती क्षमता विस्तारण्यासह जगाला इंधन पुरवठा करण्याचे ध्येय विशद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India aims to double coal production in five years