सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर हा पाच टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २००२-०३ या आर्थिक वर्षानंतर पहिल्यांदाच विकासदर इतका खाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षात विकासदर ५.५ टक्के राहील, असा अंदाज गेल्या महिन्यात वर्तविण्यात आला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार तो आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. भारताचा कृषी उत्पादनाचा दर १.८ राहण्याची आणि उत्पादन दर १.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम विकासदरावह दिसणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षांमध्ये विकासदर ६.२ टक्के राहिला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी वर्तविलेले सर्व अंदाज चुकण्याची शक्यता अधिक आहे.
चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) घट होण्याचा अंदाज होताच. मात्र, वाहतूक, दळणवळण, हॉटेल, व्यापार आदी सेवाक्षेत्रांमधील उत्पन्नात अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्याचा परिणाम विकासदरावर होईल, असे मत आयएनजी वैश्य बॅंकेच्या अर्थसल्लागार उपासना भारद्वाज यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias economic growth rate for 2012 and 13 to plunge to 5 percent says government