Astrological Prediction Modi 2024 Government : भारतीय जनता पार्टी (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी सद्यस्थितीत सत्ताधारी असलेला महत्त्वाचा पक्ष आहे. २०१४, २०१९, २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला २०२४ साली बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. नेमकं याचे कारण काय ? येत्या काळात भारतीय जनता पार्टीची स्थिती काय असेल ? भारतीय जनता पार्टीच्या निर्णयांचा सर्वसामान्यांना फटका बसणार का? भारतीय जनता पार्टीची कुंडली काय सांगते आहे यावर एक नजर टाकू या…

लग्नकुंडली, लग्नस्थानावरून बुद्धीची क्षमता कळते. तर चंद्रकुंडलीवरून मानसिक स्थितीचे अवलोकन होते. आपली मानसिकता, आपले निर्णय, आपल्या विचारांची क्षमता जातकांच्या गोचर स्थितीतून समजू शकते. खूप वेळा अचूक निर्णय घेणाऱ्यांचेही निर्णय चुकतात किंवा आज फायद्यासाठी घेतलेले निर्णय कालांतराने धोक्याचे ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे शुभ-अशुभ ग्रहस्थिती लक्षात न घेता घेतलेले निर्णय हेच असतात.

भाजपच्या कुंडलीत मिथुन हे वायू राशीचे बौद्धिक लग्न आहे. चारही बाजूने विचार करण्याची उत्तम क्षमता या लग्नामध्ये दिसून येते. राजकीय दृष्टिकोनातून या पत्रिकेचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, या लोकसमूहात विद्वान, हुशार माणसांचा उत्तम भरणा जास्त प्रमाणात दिसून येतो. तसेच लग्नेश नवमात, बुध केतू बरोबर उत्कर्षाचे, चांगल्या योजनांचे नियोजन करण्यात यांचे बौद्धिक कौशल्य यशस्वी ठरेल.

हेही वाचा…महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा…

चुकीच्या निर्णयाची मालिका सुरूच…

जेव्हा जेव्हा महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा तेव्हा यांच्यातील चाणाक्ष बुद्धी, पुढील घटनांचे चांगले- वाईट परिणाम विचारात घेऊन निर्णय घेत असते. त्यामुळे विशोत्तरी महादशेतील यांच्या शुक्र व रवीच्या महादशेत म्हणजे १९९२ ते २०१८ या काळात या पक्षाला उत्तम यश लाभले. मात्र २०१८ नंतर येणारी चंद्र महादशा आपले अशुभ परिमाण दाखवण्यास सुरुवात करू लागली आणि त्याचे परिणाम नंतर हळूहळू लक्षात येऊ लागले. षष्ठात असलेली चंद्र नेपच्यून नीति पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडवेल. षष्ठात असलेली चंद्र नेपच्यून नीति पूर्णपणे संघटनेला व्यथित करेल आणि यातूनच अधिक चुकीच्या निर्णयाची मालिका सुरू होईल, असे कुंडलीच्या अभ्यासातून लक्षात येते.

अटलजींच्या काळातला भाजप पुन्हा येईल का ?

एकूणच पूर्णपणे अहंकाराला मूठमाती देऊन प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणे महत्वाचे ठरेल. आरोप, प्रत्यारोप जितके वाढतील, तितकी परिस्थिती कठीण होईल. मग देशाला एकाच गोष्टीची आवश्यकता जाणवेल ती म्हणजे, दिवंगत भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा पुन्हा नव्या रूपात यावा. यावर उपाय म्हणजे तत्काळ लाभासाठी आलेल्यांना दूर करून संघातील सद्गुणी विचारवंत तरुणांना संधी द्यायला हवी. कारण हेच उद्याच्या भारताचे खऱ्या अर्थाने रक्षण करतील!