Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे एक उत्तम शिक्षक, तत्वज्ज्ञ, अर्थशास्त्रतज्ज्ञ आणि राजकारणी होते.त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जात असे. त्यांना समाजशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धनीती, इत्यादी क्षेत्रात अलौकिक ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांनी एक धोरणात्मक ग्रंथ लिहिला, त्याचे नाव चाणक्य नीती होते. या ग्रंथा त्यांनी माणसाला यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचे अनुकरण करतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये बुद्धिमान व्यक्तीचे काही गुण सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

“प्रस्तावसदृशं वाक्यं प्रभावसदृशं प्रियम् । आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः॥”

या श्लोकामधून चाणक्य सांगतात की, केव्हा काय बोलावे, कोणावर प्रेम करावे व किती राग करावा, या तीन गोष्टी ज्या व्यक्तींना माहिती असतात, त्या अत्यंत ज्ञानी व बुद्धिमान असतात.

केव्हा काय बोलावे?

अनेकांना कधी काय बोलावे, कळत नाही. त्यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात.
आचार्य चाणक्य सांगतात की, समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांवर टीका केली जाते. याउलट जी माणसे विचारपूर्वक बोलतात त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी असल्याचे दिसून येते. त्यामुळे चाणक्य नीतिनुसार केव्हा काय बोलावे, हे माहीत असणे गरजेचे आहे.

कोणावर प्रेम करावे?

प्रत्येक व्यक्तीने योग्य व्यक्तीवर प्रेम करावे, असा सल्ला आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीद्वारे देतात. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोणावर प्रेम करावे, याची जाण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेम करताना विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.

किती राग करावा?

राग हा नेहमी घातक असतो. म्हणूनच त्याला माणसाचा शत्रू मानले जाते. कारण- रागाच्या भरात अनेक लोक स्वत:चे नुकसान करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. अनेकदा आपण रागाच्या भरात खूप काही गमावून बसतो आणि आपल्या लोकांपासून दूर होतो. त्यामुळे किती राग करावा, हे ज्या व्यक्तीला कळते, ती व्यक्ती अत्यंत ज्ञानी व समजूतदार असते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)