Deputy Chief Minister Devendra Fadnavis: खवळलेल्या समुद्रालासुद्धा ओहोटी आली की, नतमस्तक व्हावे लागते. हा निसर्गाचा नियम आहे मग बुद्धीमान राजकारणी माणसात ही समज का नसावी? राजकारणात इंदिरा गांधीनाही त्यांच्या अहंगडामुळे पायउतार व्हावे लागले होते. एकूण सध्याचे राजकारण पाहता दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय स्थितीत अहंपणाचा हा वारु सुसाट सुटला आहे. प्रसिद्धी माध्यमात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांची भाषा, त्यांचे बोलणे, हातवारे पाहता राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे तेच दिसून येते आणि ही सर्व अरेरावी पक्षबदलू लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. केवळ स्वार्थापोटी आलेली ही मंडळी त्यांना पक्षाचा दर्जा, विचारसरणी यांच्याशी काहीही देणे- घेणे नसते. कधीही पक्ष सोडून जाण्याची त्यांची तयारी असते आणि विशेष म्हणजे पक्षाच्या जुन्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सहज बाजूला सारून स्वतःपुढे येऊन ते मिरवत असतात. ही सारी गंमत चतुर जनता शांतपणे पाहात असते. अशा या लोकांमुळेच पक्षाचा दर्जा खालावत असतो. खऱ्या अर्थाने या अहंकारी वागणुकीला जनता आता कंटाळलेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनातून असा पक्ष पार खाली उतरतो. त्यामुळेच जाणकार समजुतदार उत्तम बोलणारे प्रवक्ते खऱ्या अर्थाने मतदार तयार करत असतात. नेत्यांच्या भाषणांनी लोकमत फारसे तयार होत नाही व झाले तर कधी कधी फार नुकसान होते.

या राजकीय परिस्थितीत संयमाने बोलणारे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षश्रेष्ठींचा आदेश तंतोतंत पाळणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे नाव गेली दहा वर्षे वादळी ठरत आहे. हे वादळ देवेंद्र फडणवीस यांच्या पाचवीला पुजल्यासारखे मागे लागले आहे. तरीही ही व्यक्ती कुठेही न डगमगता, न मागे येता हसतमुखाने वेदनेची एकही छटा चेहऱ्यावर न दाखवता मोठ्या हिंमतीने बाजी लढवत आहे. त्याचं कारण लग्नी वायूत्वाची बौद्धिक तूळ रास आणि तुळेत उत्तम मानसिकता सांभाळणारा गुरु. दशमात मातबगार रवी, मंगळाबरोबर नवीन राजकीय डावपेचांना यश देणारा बुद्धीमान बुध एकूण हे सारे ग्रह फडणविसांच्या मदतीला पत्रिकेत ठाण मांडून बसले आहेत. प्रसंगी आपल्या पक्षातील लोकांना बाजू करण्याचे धाडसही त्यांनी केले. कारण- कुठेही महाराष्ट्रात आपला पक्ष बदनाम ठरू नये म्हणून त्यांनी अशा लोकांना खुबीने मागे सारले. मेष राशीचा शनि उत्तम प्रशासनात मदतीचा ठरतो. तर एकादशीतील शुक्र केतूही मागे नाहीत. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चाळीस आमदारांसह घेऊन युती सत्तेत आणली. दिल्लीश्वरांच्या आदेशाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदही दिले. पंचमातील चंद्र – राहूचे हे औदार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…”

लोकसभेत भाजपला फार मोठे यश लाभले नाही, फक्त दहा जागा मिळाल्या. आपण कुठे तरी कमी पडलो अशा अपराधी भावनेने त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. इतका जाणकार दुसरा नेता भाजपकडे महाराष्ट्रात नाही. एक मात्र खरे की, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांशी केलेल्या युतीचा फारसा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला नाही. मात्र आता येणारा काळ केतू महादशेत बुधाची अंतर्दशा २६ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. आपल्या साहस, शौर्यातून फडणवीस यश आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न विधानसभेसाठी करतील. परंतु एकादशात केतू- शुक्र हे तुमचा मित्र परिवार दाखवतात, त्याचा परिणाम तुमच्या कार्यावर होत असतो. त्यामुळे फडणवीसांनी एक महत्त्वाची काळजी घ्यावी ती म्हणजे, आजुबाजूस अहंगंडाने बोलणारी माणसे टाळावीत. विनय आणि विश्वासाच्या भाषेनेच माणसे जोडली जातात त्यातून नवीन पर्व सुरू होऊ शकते.