Hanuman Jayanti 2025 Puja Vidhi Shubh Muhurat : हनुमान जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो. श्री हनुमान हे अफाट शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याची श्रीरामावर असीम भक्ती होती. देशात अनेक ठिकाणी तसेच जगाच्या विविध कोपऱ्यात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी मोठ्या श्रद्धेने श्री हनुमानाची आराधना केली जाते. काही भक्त या दिवशी उपवास करतात. घरी हनुमानाची पूजा करतात किंवा हनुमानाच्या मंदिराला भेट देतात. यंदा हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी शनिवारला आहे. शनिवार हा हनुमानाचा दिवस आहे. त्यामुळे यंदाची हनुमान जयंती अधिक शुभ मानली जात आहे. या दिवशीचा शुभ तिथी कधी सुरू होणार आणि कधी समाप्त होणार, पूजा विधीचा शुभ मुहूर्त कोणता, या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

हनुमान जयंती शुभ मुहुर्त

हनुमान जयंती (१२ एप्रिल) च्या दिवशी पहाटे ०३:२१ वाजता चैत्र पौर्णिमा तिथी सुरू होणार आणि १३ एप्रिल रोजी पहाटे ०५:५१ वाजता ही तिथी संपणार. या शुभ मुहूर्तादरम्यान तुम्ही पूजा विधी पार पाडू शकता
हिंदू पंचाननुसार, हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता, म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते.

परंपरा आणि विधी

हनुमान जयंतीच्या दिवशी, भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो. पहाटे भक्त हनुमान चालीसा म्हणतात आणि गूळ, केळी आणि खायच्या पानाचा प्रसाद देतात. अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास सुद्धा करतात.

हनुमानाचे मंत्र

पूजा विधी करताना तुम्ही हनुमानाचे खालील मंत्राचा जप करू शकता.

भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे – ओम श्री हनुमते नमः. ।

ॐ नमो भगवते हनुमते नमः

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा

ओम नमो हनुमंतेश्वर रूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महा बलाय सूर्य कोटि समप्रभा

ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा

ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥’

आध्यात्मिक महत्त्व

श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहेत. त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, नकारात्मक उर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते, असे मानले जाते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)