Navratri avoid these mistakes: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अगदी गुढीपाडव्यापासून ते गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी या सर्व सणांचे खास महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक सणामागे धार्मिक कारणाबरोबरच वैज्ञानिक कारणही जोडलेले आहे. दरम्यान, नुकतीच शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून, आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे. खरे तर वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. त्यातील पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते; तर शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात

आज गुरुवार, ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू झाली असून शुक्रवार, ११ ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. दरम्यान, नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी.

नवरात्रीत या चुका टाळा (Navratri avoid these mistakes)

  • भांडण, कलह करू नका

नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा-आराधना केली जाते. त्यामुळे या काळात तुमचे मन शांत ठेवायला हवे. या काळात घरामध्ये, तसेच घराबाहेरही भांडण, कलह करू नका.

  • घर बंद ठेवू नका

नवरात्रीच्या दिवसांत तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल, तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका. घरामध्ये कोणीतरी असायला हवे याची काळजी घ्या. तसेच या काळात आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांव्यतिरिक्त इतरांनी दिवसाचे झोपू नये.

  • स्त्रीचे मन दुखवू नका

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते. यादरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन दुखवू नका. विनाकारण कोणत्याच स्त्रीला वाईट वाटेल आणि तिचा अपमान होईल, असे करू नये. या नियम फक्त नवरात्रीतच नव्हे, इतर दिवशीदेखील पाळणे गरजेचे आहे. तसेच नवरात्रीत स्त्रियांनीदेखील इतर स्त्रियांचा अपमान करू नये.

  • तामसिक आहार खाऊ नका

नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार, मद्यपान यांपैकी कशाचेच सेवन करू नये. या काळात जास्तीत जास्त शुद्ध, सात्त्विक आहार घेतला जाईल याकडे लक्ष द्या.

नवरात्रीत या गोष्टी अवश्य करा (Navratri do these things)

  • अखंड ज्योत लावा

हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. त्यामागे असे कारण आहे की, दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावावी. कारण- अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते.

  • मंत्र आणि स्तोत्राचे पठण

नवरात्रीच्या पवित्र दिवसांत देवीला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त स्तोत्र आणि मंत्राचे पठण करा. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेन आणि तुमच्या कुटुंबात सुख-संपत्ती प्रदान करील.

हेही वाचा: Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? ‘हे’ आहे धार्मिक महत्त्व

  • गरिबांना दान करा

नवरात्रीच्या दिवसांत तुम्हाला तुमच्या कामामुळे कोणतीच गोष्ट करणे शक्य नसल्यास अशा वेळी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला पैशांची किंवा अन्नदानाची मदत करा.