-दा. कृ. सोमण
पूर्वी सासरी गेलेल्या मुली आईची आठवण आली की अंगणातील तुळशीवृंदावनाजवळ बसून तिलाच आई समजून गप्पा मारायच्या. कधी कधी तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा करीत रडून मन मोकळे करायच्या. आजही तुम्ही तुळशीपाशी जाऊन मन एकाग्र केलेत तर ती तुमच्याशी बोलते. तुमचे ऐकते. मन मोकळे करायला ती एक हक्काची मैत्रीण आहे. तुमच्या घरापाशी तुळस आहे का? नसल्यास शक्य होईल तेवढी लवकर आणून लावा आणि हो त्यापूर्वी हे तुलसीमाहात्म्य जाणून घ्या…
‘माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी सुद्धा माणसारखे वागावे’ अशी सनातन वैदिक धर्माच्या शिकवण आहे. भारतीय संस्कृतींत पर्यावरणाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. औषधी वनस्पती गावात नेहमी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा अंतर्भाव धार्मिक पूजाद्रव्यामध्ये करण्यात आला आहे. या औषधी वनस्पती देवांना प्रिय आहेत असेही सांगण्यात आले आहे. त्यामध्ये तुलसी या वनस्पतीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.आज आपण तुलसीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत.
हिंदू माणसाचे घर म्हटले की, बाहेर घरासमोर अंगणात तुळशीवृंदावन हे असणारच! तुळशीवृंदावनाभोवती रांगोळी असणारच! रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचे आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. तिन्हीसांजा तुळशीवृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हटले जाते. प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात. तिला वात्सल्यमयी माता समजतात.
महिला तुलसीपुढे आपले मन मोकळे करतात. कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणी करतात. तुळशीला जिवाभावाची मैत्रिण समजून तिच्याशी संवाद साधतात. सांजसकाळ तुलसीचे दर्शन घेऊन पुढील प्रार्थना करतात.
तुलसि श्रीसखि शुभं पापहारिणि पुण्यदे।
नमस्ते नारदस्तुते नारायणमन:प्रिये ॥
या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे – हे तुळसी, तू लक्ष्मीची मैत्रिण , शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारद तुझी स्तुती करतो. तू नारायणाच्या मनाला अत्यंत आवडतेस. तुला नमस्कार असोत.
प्राचीन कालापासून ही धार्मिक परंपरा जोपासली गेली आहे. श्रीसत्यनारायण पूजेच्यावेळी विष्णूसहस्र नावे घेऊन एक हजार तुलसीपत्र नारायणाला अर्पण करतात. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी रोजी तुलसीविवाह संपन्न झाल्यावरच माणसांचे विवाह संपन्न होत असतात. ही प्रथा फार प्राचीन कालापासून पाळण्यात येत आहे.
तुलसीची उत्पत्ती
तुलसीचे मूळ नाव तुळस असावे. तुलसी हे त्या नावाचे संस्कृतीकरण झाले असावे असे व्यत्पत्तिकोशात म्हटले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात ‘तुलसी‘ हे नाव का मिळाले ते सांगितले आहे.
नरा नार्यश्च तां दृष्ट् वा तुलनां दातुमक्षमा:।
तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद:॥
नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना. म्हणून पुरातत्त्ववेत्ते तुलसी या नावाने तिला संबोधू लागले, असा वरील ओळींचा अर्थ होतो.
देव-दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघाले, त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निघाली. ती तुळस ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना दिली असे स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे. दुसऱ्या एका कथेप्रमाणे जलंधराची पत्नी वृंदा हिच्यापासून तुलसीचा जन्म झाला असे सांगण्यात आले आहे. पुराणात तुलसी जन्माच्या आणखीही कथा सांगण्यात आल्या आहेत.
पद्मपुराणात तुलसीमाहात्म्य सांगितले आहे. तुलसीचे केवळ दर्शनही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे. तुलसी ही वृंदावनात राहते. ती विष्णूला परमप्रिय आहे. तुलसीदलाशिवाय विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते, असं पद्मपुराणात म्हटलं आहे.
मणिकांचनपुष्पाणि तथा मुक्तामयानि च।
तुलसीदलपत्रस्य कलां नार्हन्ति षोडशीम्॥
सुवर्णाची, रत्नांची आणि मोत्याचीही फुले असली (विष्णूला वाहिली) तरी त्यांना तुलसीपत्राच्या सोळाव्या कलेचीही सर येणार नाही, असा या ओळींचा अर्थ होतो.
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिंकरा:॥
ज्या घरी तुलसीचे बन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत, असा या ओळींचा अर्थ आहे.
तुलसीच्या बनाभोवतालची जमीन ही गंगेसारखी पवित्र असते असे पद्मपुराणात सांगण्यात आले आहे. स्नान करून नंतरच तुलसी पाने काढावीत. पाने ओरबाडून काढू नयेत. तुलसीची पाने काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना म्हणावी
तुलस्यमृतजन्मासि सदा त्वं केशवप्रिये।
केशवार्थे विचिन्वामि वरदा भव शोभने॥
या ओळींचा अर्थ, हे तुलसी, तू अमृतापासून जन्मली आहेस. तू विष्णूला सर्वकाल प्रिय आहेस. मी विष्णूसाठी तुला खुडतो. हे शोभने, तू मला वर देणारी हो, असा आहे.
भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करतांना त्यावर तुलसीपत्र ठेवतात. तरच भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करतात अशी श्रद्धा आहे. तुलसीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, पूजन, रोपण आणि सेवन हे पुण्यदायक मानले जाते.
पांडुरंगप्रिया तुलसी
भगवान विष्णूच्या, कृष्णाच्या आणि पांडुरंगाच्या पूजेच्यावेळी तुलसीचा हार घालतात. भागवत संप्रदायात तुलसीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वैष्णव लोक आणि वारकरी तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ तयार करून ती आपल्या गळ्यात ठेवतात. वारकरी महिला पंढरीच्या वारीला जाताना डोक्यावरून पितळेचे वृंदावन नेतात. सर्व देवांच्या पूजेत तुलसीपत्र अर्पण करतात. फक्त गणपतीच्या पूजेमध्ये गणेशचतुर्थीचा दिवस सोडला तर इतर दिवशी तुलसीपत्र अर्पण करण्याची प्रथा नाही. गणेशाने तुलसीला तसा शाप दिल्याची कथा ब्रह्मवैवर्त पुराणातल्या गणेशखंडामध्ये आहे.
ब्रह्मकल्पामध्ये तुलसी तीर्थक्षेत्रांना भेट देत होती. गंगा नदीच्या काठावर श्रीकृष्णाचे ध्यान करीत बसलेल्या गणेशाकडे तिचे लक्ष गेले. त्याला पाहून तुलसी मोहित झाली. ती गणेशाला म्हणाली, “गणेशा तू ध्यानधारणा सोड.” तरीही गणेशाची कृष्णभक्ती व ध्यान चालूच होते. तुलसीने गंगेचे पाणी गणेशावर उडविले. गणेशाने डोळे उघडले. तिच्याकडे पाहून गणेश म्हणाला, “तू कोण आहेस? कुठून आलीस?“
तुलसीने सांगितले, “मी धर्मात्मजाची मुलगी तुलसी आहे. पतिप्राप्तीसाठी मी तपस्या करीत आहे. तू माझा स्वामी हो.” त्यावर गणेश म्हणाला, “हे बाई, मला त्या गोष्टीची इच्छा नाही. माझ्या ध्यानधारणेत तू अडथळे आणू नकोस. तू इथून निघून जा. दुसऱ्या कुणाची तरी पति म्हणून निवड कर.” हे ऐकून तुलसी क्रोधित झाली. त्यावर गणेशाने तिला शाप दिला की, “तू झाड होशील.” हा शाप ऐकून तुलसी रडू लागली. त्यामुळे गणेशाला दया आली. गणेश म्हणाला, “तू पुण्यस्वरूप होशील. नारायणास प्रिय होशील. विशेषकरून श्रीकृष्णाला प्रिय होशील.” त्यामुळे तुलसी नारायणाला प्रिय झाली. मात्र गणेशाला अप्रिय झाली. म्हणून तुलसी गणेशाला अर्पण करीत नाहीत.
माणसाच्या मृत्यू समयी मुखात, कपाळावर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवतात. म्हणजे आत्मा वैकुंठाला जातो अशी श्रद्धा आहे.
तुलसी ही औषधी वनस्पती आहे. ती गावात उपलब्ध रहावी या हेतूमुळे तुलसीचे धार्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. पूर्वी धर्मशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी लोक आचरणात आणीत असत. आज पुराणातील गोष्टींवर लोक विश्वास ठेवतील असे नाही. या वैज्ञानिक युगात विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टीही लोक आचरणात आणतात. म्हणून आयुर्वेदामध्येही तुलसीचे गुणधर्म सांगितले आहेत.
तुलसीच्या दर्शनाने पापनाश होतो. सेवनाने रोगनाश होतो. तुलसी प्रदक्षिणा घातल्यास पुण्यप्राप्ती होते. तुलसीच्या मुळाशी सर्व तीर्थे, मध्यात ब्रह्मा व अग्रभागी वेदशास्त्रे वास करतात. हिच्या मुळाशी विष्णू व हिच्या छायेमध्ये लक्ष्मी वास करते अशी श्रद्धा आहे. तुलसी उपनिषदात तुलसीचा गायत्रीमंत्र दिलेला आहे तो पुढीलप्रमाणे –
श्रीतुलस्यै विद्महे । विष्णूप्रियाय धीमहि । तन्नो अमृता प्रचोदयात् ॥
(लेखक पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक आहेत.)