औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. २१ व्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी १ लाख १५ हजार ५२५ मतांनी आघाडी घेतली. औरंगाबाद लोकसभेचा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. एमआयएमला मिळालेल्या मतांबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, या शहरावर मी खूप प्रेम केलं होतं. पण आज निकाल पाहतोय तर दिसतंय की माझं एकतर्फी प्रेम सुरु होतं. मला १० वर्ष येथे काम करण्याची संधी मिळाली. पाच वर्ष आमदारकी व पाच वर्ष खासदारकी मिळाली. निवडणुकीत जनतेला जो आवडतो त्याला जनता मत देते. मी जनतेला हेच म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जर कोणी चांगला उमेदवार असेल, जो तुमचे प्रश्न सोडवेल, तुमच्यासाठी लढेल त्याला तुम्ही मत द्या. पण तुम्ही जातीधर्माच्या आधारावर मत देऊ नका. आता जनतेने ज्याआधारे मतदान केलंय त्यांचं मी स्वागत करतो. इम्तियाज जलील यांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “मविआचे १८ खासदार जिंकले, तर राजकारणातून संन्यास घेईल”, आशिष शेलार यांच्या विधानाची आठवण करून देत अंधारेंची टीका

निकाल धक्कादायक

इम्तियाज जलील म्हणाले, हा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे. अनपेक्षित आहे. मी दिल्लीत शहराचे प्रश्न घेऊन गेलो होतो. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भरपूर वाव आहे. संदिपान भुमरे हे सत्ताधारी पक्षाचे आहे. ते या जिल्ह्याचा विकास करतील अशी अपेक्षा ठेवतो. मी जनतेला आवाहन केलं होतं की माझ्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर त्याला तुम्ही मतदान करा. जातीधर्माच्या आधारावर मतदान करु नका. आता भुमरेंना जातीच्या आधारावर मत मिळालंय की नाही, याचं विश्लेषण आम्ही करू.

देशातील निकालाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघतोय

देशातील लोकसभा निकालावर इम्तियाज जलील म्हणाले, मी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघतोय. भाजपाच्या नेत्यांना गर्व झाला होता. महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा तसंच देशात ४०० पार जागा जिंकण्याचा. जनता तुम्हाला १० वर आणू शकते आणि ४८ वरही नेऊ शकते.

हेही वाचा : भाजपच्या हॅटट्रिकचे स्वप्नभंग करत विशाल पाटील लाखाच्या मताधिक्यांने विजयी

पत्रकारीतेत पुन्हा येणार का?

दरम्यान, पत्रकारितेत पुन्हा येणार का असा सवाल पत्रकारांनी इम्तियाज जलील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पत्रकारितेत चांगला पर्याय मिळाला तर पुन्हा बुम घेऊन उभा राहणार, अशी मिश्किल टिपणी जलील यांनी केली.

हेही वाचा : “सातारच्या निसटत्या पराभवाची मनात सल”; जयंत पाटील म्हणाले, “दहापैकी सात उमेदवार…”

इलेक्टोरल रिफाॅर्मची केली मागणी

या देशात इलेक्टोरल रिफाॅर्म आणण्याची आवश्यकता आहे. हजार, दोन हजार, तीन हजार मतं घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याचा अर्थ निवडणुकांकडे मनोरंजन म्हणून काही उमेदवार बघतात. यात संविधानिक सुधारणा करणे गरजेचे आहे. दोन हजार, तीन हजार मतं घेणाऱ्या उमेदवारांबाबत काही नियम बदलण्याची आवश्यकता आहे. बिनकामाचे उमेदवार, जे फक्त मनोरंजनासाठी उभे राहतात त्यांच्यासाठी काहीतरी नियमांची आवश्यकता आहे, असं जलील यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न जलील यांना विचारण्यात आला, त्यावर मला कोणी इंडिया आघाडीत घ्यायला तयार नाही. कोणी घेणार असेल तर बघू, अशी कोपरखळी जलील यांनी दिली.