सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : १०४ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ जानेवारी १९२० रोजी स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकावर वामन दादा कर्डक यांनी लिहिलेल्या गीतास छत्रपती संभाजीनगरचे संगीतकार डॉ. संजय मोहड यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘मिश्र खमाज व लोकधून’वर आधारित हे गीत गायक हरिहरन यांनी गायले आहे.

भीमगीतांमध्ये पहिल्यांदाच दिलशाद खान यांनी सारंगी वाजवली आहे. भीमगीताचा बाज बदलविणारे हे गाणे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी प्रसारित होणार आहे. एखाद्या वर्तमानपत्राच्या आयुष्याचे गाणे व्हावे, ही भारतीय वृत्तपत्रसृष्टीतील पहिलीच घटना असावी. बाबासाहेबांची भूमिका मांडताना वामन दादा कर्डक केवळ दोन शब्दांचा मुखडा करतात –

मी मूकनायक

मी मुक्याची गाणी, मी मुक्यांची वाणी

मीच मार्गदाता, मीच गायक

बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ या पाक्षिकातील पहिल्या अग्रलेखात जात वास्तव समजून सांगितले होते. त्याला पुढे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेबांची मूकनायक प्रकाशित करण्याची भूमिका मांडली ती अशी

मी दुबळ्यांसाठी लढतो

मी दुबळ्यांसाठी रडतो

काळ्या काळजाला मी क्लेशकारक

मी तथागताचा पुत्र, मी फुलेंसारखा मित्र

मीच इथे ‘ वामना’चा नेक सहायक

हेही वाचा >>>लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर

बाबासाहेबांच्या भूमिकेची आणि विचारांची गाणी तयार झालीच. पण या गाण्याचा बाज अभिजात संगीताचा आहे. संगीतकार डॉ. संजय मोहड म्हणाले, ‘हे गाणे नक्की कोणासाठी आहे, हे खूप उशिरा कळाले. वामनदादांवर पीएचडी करताना हे गीत बाबासाहेबांसाठीच लिहिले असावे असे वाटले होते. पण बाबासाहेब महात्मा फुलेंना मित्र म्हणणार नाहीत. ते त्यांना मार्गदर्शक मानत होते. पण पुढे लक्षात आले, की हे गाणे ‘मूकनायक’ या पाक्षिकावरचे आहे. ३१ जानेवारी १९२० मध्ये प्रकाशित झालेले पाक्षिक तसे अल्पजीवी ठरले. सुरुवातीच्या १२ अंकांत बाबासाहेबांचे अग्रलेख प्रकाशित झाले होते. बाबासाहेब आंबेडकर इंग्लडला गेले. तेथून हे पाक्षिक चालविले. १९२३ मध्ये ते बंद पडले. पुढे महाड येथे बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन झाल्यानंतर चळवळीसाठी बहिष्कृत भारत हे नवे पाक्षिक प्रकाशित करण्यात आले.

शंभर गाण्यांचे ‘गीत भीमायन’

‘गीत भीमायन’ हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हाती घेण्यात आला असून, यात वामनदादांनी लिहिलेली १०० गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.

Story img Loader