सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : पायाभूत मतामध्ये वजाबाकी, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ‘मद्यासम्राट’ अशी तयार केलेली प्रतिमा असे सारे वजाबाकीची गणिते असतानाही महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे निवडून आलेच कसे, या प्रश्नाच्या उत्तराचे श्रेय भाजपचे व्यवस्थापन कौशल्य आणि मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामी राहण्यात दडले असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

औरंगाबाद मध्य आणि पूर्व या दोन्ही मुस्लीम बहुल मतदार एकगठ्ठा मतदान करेल आणि हिंदू लोकप्रतिनिधी असणार नाही, या मानसिकतेतून हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले आणि भुमरे एक लाख ३४ हजार ६५० मतांनी निवडून आले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून केवळ २८ दिवस आधी प्रचार करून निवडून आलेले आमदार इम्तियाज जलील यांना मतविभाजनाचा लाभ होत गेला. लोकसभेची निवडणूकही त्यांनी कमी कालावधीमध्ये जिंकली होती. या वेळीही मतविभाजनाचा भाग तेवढाच असेल असे गृहीत धरून त्यांनी आखलेली योजना यशस्वी झाली नाही ते वंचित बहुजन आघाडीमुळे. त्यांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर केलेल्या भाषणातून वंचितच्या उमेदवारास भाजप नेत्यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेखही त्यांनी केला. कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास ६९ हजार २६६ मते मिळाली. त्यामुळे इम्तिजयाज जलील यांना तीन लाख ४१ हजार ४८० मतांवर थांबावे लागले. भूमरे यांना चार ७६ हजार १३० मते मिळाली.

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या व्यवस्थापन कौशल्याची भुमरे यांना साथ

पण चर्चेत असणारे खैरे यांची गाडी मात्र तिसऱ्या क्रमांकावर थांबली. त्यांना दोन लाख १३ हजार ४५० मते मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराला पुरेसा वेळ असतानाही चंद्रकांत खैरे यांच्या निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्हच लावले गेले. आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची सिडको येथील तुलनेने लहान मैदानात सभा झाली होती. ते मैदान उद्धव ठाकरे व्यासपीठावर चढण्यापूर्वीपर्यंत भरले नव्हते. शरद पवार यांनी खैरे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत तर निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.

सहानुभूती असूनही त्याचे मतामध्ये रुपांतर करण्यास असमर्थ

मराठवाडा सांस्कृतिक भवनावरील उद्धव ठाकरे यांच्यासभेला महिलांची बाजू भरण्यासाठी शिवसैनिकांची दमछाक सुरू होती. निवडणूक व्यवस्थापनात अनेक कमतरता असल्याचे लक्षात आल्यानंतरही चंद्रकांत खैरे यांनी प्रचाराची दिशा बदलली नाही. भूमरे यांना ‘गद्दार’ आणि ‘मद्यासम्राट’ ठरविण्याच्या नादात सहानुभूती असूनही त्याचे मतामध्ये रुपांतर करण्यास खैरे यांना यश आले नाही. उलट मुस्लीमस्नेही प्रतिमा अधिक मतदान देईल हा त्यांचा भरवसा त्यांना घातक ठरला.

आक्रमक हिंदुत्वाचा फायदा

● भुमरे यांच्यासाठी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराच वेळ दिला. बैठका घेतल्या. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल यांच्यासह भाजप नेत्यांना बरोबर घेत त्यांनी प्रचारात आक्रमक हिंदुत्व कायम ठेवले.

● परिणामी ‘संभाजीनगर’ चा गड भुमरे यांना राखता आला. भुमरे यांना कन्नड, गंगापूर, वैजापूर या मतदारसंघातून आघाडी मिळत गेली तर औरंगाबाद पूर्व व मध्य या दोन्ही मतदारसंघात इम्तियाज जलील यांचा दबदबा होता. त्यामुळे लोकसभेची लढत भूमरे विरुद्ध जलील अशी झाली आणि खैरे मागे पडले.