औरंगाबाद रेल्वे दुर्घटने प्रकरणी रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला. दरम्यान लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे की, “कामगारांना ट्रॅकवर पाहिल्यानंतर लोको पायलटने मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान दुर्घटना घडली. जखमींना औरंगाबाद सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत”.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मजुरांची नावे आणि अपघाताचे इतर तपशील अद्याप समजू शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनेची दखल घेतली असून केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. शक्य ती सर्व मदत दिली जावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown inquiry ordered in aurangabad incident train driver tried to stop but eventually hit migrants sgy