छत्रपती संभाजीनगर : विधिमंडळाचा सदस्य नसला तरी सहा महिने मंत्रीपदी राहता येत असल्याच्या तरतुदीच्या आधारे लोकसभेवर निवडून आले तरी रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे हे विधानसभा निवडणुकीपर्यंत मंत्रीपदी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत संदीपान भुमरे यांनीच मंत्रीपदी काम करावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यांसाठी नवीन मंत्री करण्याऐवजी. भुमरे यांनाच कायम ठेवण्यात येईल, असे समजते. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या अनुषंगाने भुमरे यांना विचारले असता, ‘ शिंदे जसे म्हणतील तसे. आपण काही मंत्रीपदी ठेवाच ठेवा, असे काही म्हणालो नव्हतो’ असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांचे पद रिक्त होईल आणि ते पालकमंत्रीपद भाजपचे मंत्री अतुल सावे यांना मिळावे यासाठी भाजपच्या मंडळींनी हालचाली करायला सुरुवात केली होती. पालकमंत्री पद सावे यांना देण्याच्या मागणीसाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. या प्रस्तावावर ‘ विचार करू’ असेही सांगण्यात आले. ते पालकमंत्री पदीही कार्यरत आहेत.

हेही वाचा >>>धाराशिव: सीना नदीपात्रात वाळू माफियाकडून गोळीबार, गोळी लागल्याने एक जण गंभीर

आचारसंहितेपर्यंत भुमरेंकडे मंत्रीपद

गेल्या आठवड्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्याही पेरल्या जाऊ लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वी कमी कालावधीसाठी का असेना संजय शिरसाठ यांना मंत्री बनवले जाईल असा दावा त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. मात्र, आहे ते मंत्रीपद कायम ठेवावे व निवडणुकीला सामोरे जावे, अशी रणनीती शिवेसना शिंदे गटाच्या वतीने आखली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुका तोंडावर असल्याने भुमरे यांनी हे पद न सोडता आचारसंहितेपर्यंत काम करावे असा निर्णय झाल्याचे समजते.