जालना : दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा ठार तर तीन जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री जालन्याजवळील कडवंची गावापासून गेलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३५१ दरम्यान घडली. मृतांमधील तीन जण मुंबईमधील मालाडचे तर अन्य तिघे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

नागपूरहून मुंबईकडे जाणारी कार (क्र. एमएच ४७ – बीपी ५४७८) आणि विरुद्ध दिशेने येणारी कार (क्र. एमएच-१२-एमएफ-१८५६) यांच्यात धडक झाली. या अपघातात मालाडपूर्वमधील कारचालक राजेशकुमार, त्याचप्रमाणे मालाडचेच रहिवासी शकील मन्सुरी, अल्ताफ मन्सुरी जखमी झाले आहेत. मालाडच्या कारमधून प्रवास करणाऱ्या सहापैकी तिघांचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. तर बुलढाण्यातील कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा…सिल्लोड तालुक्यात बालविवाह रोखला

दोन्ही कारमधील १०/१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलय, तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.