गोदावरी पात्रात २५ हजारांवर क्युसेकने विसर्ग
औरंगाबाद : पैठण येथील नाथसागरच्या एकूण दरवाजांपैकी १८ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातील १२ दरवाज्यांची उंची रविवारी सकाळी नऊच्या सुमारास दीड फुटापर्यंत नेण्यात आलेली आहे. तर सहा दरवाज्यांची उंची एक फुटापर्यंत करून त्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे.
दीड फुटापर्यंत उघडण्यात आलेल्या दरवाजांमध्ये क्रमांक १०, २७, १८, १९, २१, १४, २३, १२, २५, ११ व १६ चा समावेश आहे. या दरवाजांची पूर्वी उंची एक फुटापर्यंत वाढवण्यात आली होती. आता या दरवाजातून सहा हजार २८८ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात वाढवण्यात आलेला आहे. तर दरवाजा क्रमांक १३, २४, १५, २२, १७ व २० हे एक फुटाने उघडण्यात आलेले आहेत. हेच दरवाजे शनिवारी अर्धा फुटापर्यंत उचलण्यात आले होते. सद्यस्थितीत सांडव्यांमधून एकून २५ हजार १५२ क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. त्यात सहा हजार २८८ हा दीड फुटाने उचललेल्या दरवाजातून तर उर्वरित ठिकाणाहून १८ हजार ८६४ क्युसेकचा समावेश आहे.
शनिवारीच राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी नाथसागरला भेट देऊन जलपूजन केले होते. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच््यासह गोदावरी रोहयोमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, लाभक्षेत्र विकासचे मुख्य अभियंता दिलीप तवार, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. या वेळी नाथसागरच्या मजबुतीकरणाबाबत व सुरक्षेबाबतचा आढावा घेण्यात आला होता.
सलग दुसऱ्यांदा शंभर टक्क्य़ांपर्यंत पाणीसाठा
नाथसागरात यंदा सलग दुसऱ्यांदा शंभर टक्क्य़ांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. गतवर्षी १५ ऑगस्टच्या दरम्यान काही दरवाजे उघडण्यात आले होते. यंदा ३ सप्टेंबर रोजी उजव्या कालव्यातून सुरुवातीला २०० क्युसेकने माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू झाला. तर ६ सप्टेंबर रोजी रात्री नाथसागराचा पाणीसाठा ९९ टक्क्य़ांपर्यंत आल्याने आठ दरवाजातून विसर्ग सुरू झाला. ७ सप्टेंबर रोजी नाथसागराचे १८ दरवाजे अर्धा फूट उंचीने उघडण्यात आले होते. त्यातून १३ हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता.