भारतात पावसाचे प्रमाण सर्वत्र वेगवेगळे असून जगातील सर्वाधिक व सर्वात कमी पाऊसही आपल्याकडेच पडतो. त्यामुळे एकाच राज्यात पाण्याचे समान वाटप होताना दिसत नाही. या साठी पाण्याचे स्थानिक साठे निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रख्यात जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातर्फे ‘क्लायमेट चेंज अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी परिसंवादात डॉ. चितळे बोलत होते. बंगळुरू येथील आयएसईसीचे माजी संचालक, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. राम देशपांडे अध्यक्षस्थानी होते. विभागप्रमुख डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. विनायक भिसे, डॉ. धनश्री महाजन यांची उपस्थिती होती.
पाण्याचे न्याय्य वाटप व्हावे, यासाठी केंद्रीय जल आयोग स्थापन करण्यात आला. पाण्याचे समान वाटप हे अशक्यप्राय आहे. तथापि किमान न्याय्य वाटप तरी होणे गरजेचे आहे. निसर्ग माणसाची गरज भागवू शकतो, तथापि हाव भागवू शकत नाही, ही बाब माणसाने लक्षात घ्यावी, असेही डॉ. चितळे म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. देशपांडे म्हणाले की, चिरंतन विकासात पर्यावरणात होत असलेला बदल हा कळीचा मुद्दा ठरत आहे. माणसाच्या उपभोगवादामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. एका बाजूला नसíगक आपत्ती, तर दुसरीकडे मानवनिर्मित आपत्ती यामध्ये वसुंधरा अडकली आहे.
परिषदेत पर्यावरण बदल, कृषी उद्योग व जैवविविधता यावर होणारा परिणाम, ग्रामीण अर्थव्यवस्था व विकास, निरंतर विकासासाठी पर्यायी योजना आदी विषयांवर १७५ शोधनिबंध सादर झाले, अशी माहिती प्रास्ताविकात डॉ. एस. टी. सांगळे यांनी दिली. डॉ. धनश्री महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need create water storage