केवळ दहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या तानाजी सावंत यांना शिवसेनेने उपनेतेपद दिलेच, पण यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारीही दिली. ११५ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर करणाऱ्या सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील शिवसेनेवर ‘नियंत्रण’ मिळविले आहे. संघटनात्मक बदलापासून ते नगर परिषदेत उमेदवार ठरविण्यापर्यंत त्यांचाच शब्द अंतिम मानला जात असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. भूम तालुक्यात त्यांच्या विरोधात तालुका प्रमुखांनी राजीनामा दिला आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले.
शिवजलक्रांती योजनेत ‘चमकदार’ कामगिरी करणाऱ्या सावंत यांना उपनेतेपद मिळाल्यानंतर त्यांचे बळ वाढले आहे. हे वाढलेले ‘बळ’ यवतमाळमध्ये सध्या शिवसेनेकडून वापरले जात आहे. व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधारक असलेले तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील रहिवासी. सुरुवातीच्या काळात भारती विद्यापीठात प्राध्यापकी केलेले तानाजी सावंत यांच्या आíथक प्रगतीचा आलेख नेहमीच चच्रेचा विषय असतो. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना असे राजकीय वर्तुळ त्यांनी पूर्ण केले. सोलापूर जिल्’ााचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले शिवाजी सावंत हे त्यांचे बंधू. त्यांनी राष्ट्रवादीचे बबन िशदे यांच्याविरोधात तीनवेळा निवडणूक लढविली. त्यात दोनवेळा शिवसेनेकडून तर एकवेळा अपक्ष म्हणून ते विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार होते. सोलापूरच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक म्हणूनही काही काळ त्यांची ओळख होती.
अनेकजण नाराज
खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट म्हणून तानाजी सावंत यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. तीन खासगी साखर कारखान्यांसह पुणे जिल्ह्य़ात इंजिनीअिरग, फार्मसी अशा विविध महाविद्यालयांचा डोलारा मोठा आहे. रियल इस्टेटमध्येही त्यांचा भलामोठा वावर आहे. पुणे येथील कात्रज परिसरात त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय आहे.
सर्वसामान्य शिवसैनिक हा व्यवस्थेविरुद्ध लढणारा असतो, असा अनुभव शिवसेनेतील नेते सांगत असतात. तसे कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत ‘लक्ष्मी’पुत्र अशी ओळख असणाऱ्या सावंतांकडे उस्मानाबाद जिल्ह्य़ाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते अस्वस्थही आहेत. नुकतेच त्यांनी उस्मानाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून नंदू राजेनिंबाळकर यांना फोडले. शिवसेनेत त्यांना प्रवेश देऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यातही सावंतांचा मोठा सहभाग होता. परंडाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सावंतांच्या कार्यपद्धतीमुळे अस्वस्थ आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देणारे अनिल शेंडगे म्हणाले, सर्वसामान्य शिवसैनिकांना निवडणुकीत लागणारी रसद पुरविण्याचे काम सावंत यांनी करण्याचे ठरविले होते. अचानक त्यांनी माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते हैराण झाले. त्यामुळे भूम नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार उभा नाही.
पहिल्यांदाच बाहेरचा उमेदवार
सुरुवातीपासून यवतमाळ मतदारसंघ काँग्रेस आणि नंतर आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात जिल्ह्य़ाबाहेरील उमेदवार कधीच उभा नव्हता. या वेळी मात्र सेनेने उस्मानाबादहून तगडय़ा उमेदवाराची आयात केली आहे. सेनेचे जिल्ह्य़ातील एकमेव आमदार संजय राठोड असून ते पालकमंत्रीही आहेत. उलट, भाजपचे पाच आमदार व मदन येरावार हे एक मंत्री आहेत, पण भाजपने काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसमोर उमेदवार उभा करायची हिंमत दाखवली नाही. सेना उमेदवाराच्या विजयाचा फटका भाजपला बसणार, हे माहीत असूनही भाजप व राष्ट्रवादीचे ‘काँग्रेसमुक्त यवतमाळ’ हे एकच ध्येय असल्याने हे दोघेही सेना उमेदवाराच्या पाठीशी उभे झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही आणि अपक्षांच्या मदतीने स्वत:ची १५१ मते असलेल्या काँग्रेसला मतदारांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या भरवशावर विजयाचा विश्वास आहे. या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा लक्ष्मीनिष्ठा महत्त्वाची ठरत असल्याचा काँग्रेसलाही अनुभव आहे.