आपल्या दृष्टीने पाणी हे फक्त पाणी असतं, भाज्या फक्त भाज्या असतात, फळं फक्त फळं असतात. पण आयुर्वेदाने त्यात विविध प्रकारचे वर्गीकरण केले आहे.

काय आहे हे वर्गीकरण?

दंतविकार, दात हलणे, सळसळणे, दातांतून रक्त येणे, पूं येणे, ठणकणे, सूज येणे

पथ्य :

सोसवेल असे गार पाणी, दूध, नारळपाणी, तांदळाची पेज, ज्वारी, सुकी चपाती, मूग, मुगाचे कढण, तूर, नाचणी. सर्व फळभाज्या व पालेभाज्या. वेलची केळे, सफरचंद, डोंगरी आवळा.

झोपण्यापूर्वी व सकाळी दोन वेळा तुरट, तिखट व कडू रसाच्या झाडांच्या काडय़ांनी सुरक्षितपणे, हिरडय़ा व दातांचे मंजन करणे. प्रत्येक खाण्यानंतर व जेवणानंतर भरपूर चुळा खुळखुळणे. कात, कापूर, लवंग, तुपाचा बोळा, निलगिरी तेल, त्रिफळा चूर्ण यांचा तारतम्याने बाह्य़ोपचार म्हणून वापर. मलमूत्रवेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

चहासारखी गरम गरम अकारण पेये, साखर गूळ असलेली सरबते, दही, आइस्क्रीम, लस्सी, बर्फ, गारगार पाणी. गहू, बाजरी, पाव, बिस्किट, केक, इ. दातांत अडकून राहतील असे पिष्टमय पदार्थ. वाटाणा, हरभरा, उडीद, चवळी, मटकी. बटाटा, रताळे, शिंगाडा, करडई, अंबाडी, शेपू, मुळा, पालक. लोणचे, पापड, इडली, डोसा, ढोकळा, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, जाम, साखरंबा, मोरांबा, मसालेदार चमचमीत पदार्थ. लसूण, हिंग मोहरी, साखर, गूळ, यांचा फाजील वापर, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, व्हिनेगार, शिरका. जेवणावर जेवण, घाईत जेवण, रात्रौ उशिरा जेवण, जागरण, जाहिरातीला भुलून विविध प्रकारच्या टूथपेस्ट. मलमूत्रांचे वेग अडविणे. दात कोरणे. अपुरी विश्रांती व झोप. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण पथ्य-कुपथ्यांमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या टाळायच्या ते पाहिल्या. त्या अनुषंगाने पाण्याचे प्रकार, पातळ पदार्थ, कडधान्ये, पालेभाज्या, सुकामेवा, फळे, बेकरीचे पदार्थ असे उल्लेख आले. त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात तेही अनुषंगाने आले. पण तरीही वाचकांच्या माहितीसाठी ते सगळे प्रकार या लेखात पुन्हा एकत्रित देत आहे.

पाण्याचे प्रकार :

शरद ऋतूतील पाणी, गंगाजल, सुरक्षित व स्वच्छ पाणी, उकळलेले पाणी, गरम पाणी, उकळून गार केलेले ताजे पाणी. फ्रिजचे पाणी, साधे पाणी, गढूळ पाणी, अस्वच्छ व शंकास्पद पाणी, पहिल्या पावसाचे पाणी, शिळे पाणी. बोअरिंगचे पाणी, क्षारयुक्त पाणी, जड पाणी, हलके पाणी. सुंठपाणी, नारळ पाणी, धनेजिरे पाणी, लिंबू पाणी, सुधाजल (चुनखडीचे निवळीचे पाणी), चंदनगंधपाणी, मधपाणी, लाह्य़ापाणी, बेलाचे व पिंपळाचे पानांचे पाणी, उंबरजल, वाळापाणी.

पातळ पदार्थाचे प्रकार :

दूध, दही, लोणी, तूप, ताक, सायीशिवायचे दूध, गोड ताक, आंबट ताक. गाईचे, म्हशीचे, शेळीचे दूध. पेढे, बर्फी, मलई खवा. कोल्ड्रिंक, लस्सी, बर्फ, आइस्क्रीम, ज्यूस, उसाचा रस. कोकम सरबत, लिंबू सरबत, पन्हे, आवळा सरबत. चहा, कॉफी, कोको, कृत्रिम पेये.

धान्ये, कडधान्य्यांचे प्रकार :

भात, तांदूळ भाजून भात, नवीन तांदूळ, जुना तांदूळ, हातसडीचा तांदूळ, मऊ भात, लाह्य़ा, भाताची पेज (जिरेयुक्त), गहू, सुकी चपाती, मका, मक्याच्या लाह्य़ा, मेथी पोळी, एरंडेल चपाती.

ज्वारी, ज्वारीच्या लाह्य़ा, बाजरी, सातू, नाचणी, वरई.

नाचणी, तांदळाची ज्वारीची व बाजरीची भाकरी, भाजणीचे पीठ, मूग, मुगाची डाळ, मुगाचे कढण, खिचडी, तूर, मसूर, उडीद, हरभरा, वाटाणा, वाल, मटार, पावटा, राजमा, कुळीथ, चवळी, मटकी, कडधान्याचे भाजून पाणी, कडधान्ये उसळी, टरफलासकट कडधान्ये.

फळभाज्यांचे प्रकार :

बटाटा, कांदा, दुध्या, तांबडा भोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, काटेरी वांगे, बियांचे वांगे, भेंडी, परवल, घोसाळे, मुळा, कोहळा, सुरण, तोंडले, कार्ले, करवेली, कोबी, फ्लॉवर, नवलकोल, बीट, गोवार, पावटा, डिंगऱ्या, श्रावण घेवडा, मटार, पापडी, शेवगा, चवळी शेंगा, ढोबळी मिरची, टमाटू, काकडी, डोंगरी आवळा. उकडलेल्या भाज्या.

पालेभाज्यांचे प्रकार :

अळू, अंबाडी, करडई, चाकवत, चुका, तांदुळजा, कोथंबीर, माठ, मेथी, राजगिरा, पालक, शेपू, घोळ, मायाळू, चंदनबटवा, उकडलेल्या पालेभाज्या.

चटणी व इतर :

धने, जिरे, मिरी, सुंठ, आले, पुदिना, लसूण, लिंबू, कैरी, चिंच, ओली हळद, मिरची, कढीलिंब, खसखस, तीळ, कारळे, मेथ्या, बाळंतशेपा, ओवा, बडीशेप, शेंगदाणे, खोबरे, हळद, ओले खोबरे, शिरका, व्हिनेगार, सॉस.

सुकामेव्याचे प्रकार :

बदाम, बेदाणा, खारीक, खजूर, सुके अंजीर, काळ्या मनुका, अक्रोड, काजू, पिस्ता, जरदाळू, काळा खजूर, हळीव, डिंक.

उसाचे पदार्थ :

गूळ, साखर, केमिकलविरहित गूळ, काकवी.

फळे :

वेलची केळी, हिरव्या सालीची केळे, संत्रे, गोड जुन्या बाराचे मोसंब, आंबा, चिक्कू, सफरचंद, अननस, पोपई, फणस, गोड द्राक्षे, जांभूळ, करवंद, बोरे, कलिंगड, ताडफळ, खरबूज, डोंगरी आवळा.

बेकरी व इतर पदार्थ :

पाव, बिस्किट, केक, खारी बिस्किटे, इडली- डोसा, ढोकळा, शेव, भजी, चिवडा, भेळ, मिसळ, फरसाण, भडंग, आंबवलेले पदार्थ, फरमेन्टेड फूड, शिळे अन्न, चॉकलेट, गोळ्या, श्रीखंड, पक्वान्ने इत्यादी. शिकरण, फ्रुट सॅलड, फळांचे ज्यूस.

मांसाहाराचे प्रकार :

अंडी, मटण, चिकन, मासे, सुकी मासळी.

हवेचे प्रकार :

मोकळी हवा, गार वारे, कोंदट हवा, बंदिस्त खोली, वातानुकूलित राहणी, समोरचे वारे, गरम हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, थंडी, कोवळे ऊन, दमट हवा, कडक ऊन, ओल, हवापालट, खराब धूर व प्रदूषणयुक्त हवा.

जेवणाचे प्रकार :

वेळेवर जेवण, कमी जेवण, अपुरे जेवण, सायंकाळी लवकर जेवण, हलका आहार; जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण, रात्रौ उशिरा जेवण, राक्षसकाली जेवण, जडान्न, अवेळी जेवण, शिळे अन्न, शंकास्पद अन्न, परान्न, हॉटेलमधील भोजन.

व्यायामाचे प्रकार :

सूर्यनमस्कार, पोहणे, फिरणे, रात्रौ जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरणे, दोरीच्या उडय़ा, कमान व्यायाम, पश्चिमोत्तानासन, शवासन, अर्धवज्रासन, शीर्षांसन, मानेचे व्यायाम, दीर्घ श्वसन, प्राणायाम, फाजील व्यायाम, व्यायामचा अभाव, गवतावर, मातीवर अनवाणी चालणे.

सायंकाळचे व्यायाम:

फाजील श्रम, बैठे काम, दीर्घकाळ ड्राइव्हिंग, फाजील वजन उचलणे, बागकाम, कमरेत वाकून फरशी पुसणे.

झोप व अंथरूणाचे प्रकार :

वेळेवर झोप, पुरेशी झोप, रात्रौ लवकर झोप व उशिरा झोप, दुपारी झोप, खंडित निद्रा, स्वप्ने, जागरण, उशीशिवाय झोपणे, फाजील उसे. कडक अंथरुण, गादी, फळी किंवा दिवाणावर झोप, चटई, ब्लँकेट, कांबळे, शाल, फोमची गादी.

विशेष उपचार :

नाकाने पाणी पिणे, साध्या पाण्याच्या भरपूर चुळा खुळखुळणे, मीठ हळद गरम पाण्याच्या गुळण्या, सकाळी व सायंकाळी तेल मसाज, डोळ्यांत लोणी, नाकांत तूप, कानशिले, कपाळ, तळहात व तळपाय यांना तूप चोळणे, जेवणाच्या अगोदर व शेवटी एक चमचा तूप खाणे. तूप व मिरेपूड मिश्रण, तुळसपाने, चंदनगंध व तुपाचा लेप, डोळे साध्या पाण्याने धुणे, कापूर, अंजन, स्वमूत्रोपचार, गोमूत्र, शिकेकाईने केस धुणे, केश्य चूर्ण. दांतवण गेरूयुक्त दंतमंजन, तुरट व कडू सालीच्या वापराचे मंजन. फिके व आळणी जेवण. लंघन, उपवास, रात्रौ न जेवणे, पूर्ण विश्रांती, मौन.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा॥

हा दु:खाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा (देह व इंद्रिये यांचा व्यापार) करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो.

– श्रीमद्भगवद्गीता अ. ६. १७.

स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी

तब्येत ठीक असणे अनेक कारणांवर अवलंबून असते आणि तब्येत बिघडणेही अनेक कारणांवर अवलंबून असते. साधारणत:  ज्या माणसांची प्रकृती ठणठणीत आहे असे वर वर दिसत असते त्याला अंतर्गत आजाराने ग्रासले असते किंवा एखाद्या विकृतीने घेरलेले असते. माणूस हा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक अशा विविध स्तरांवर जगत असतो. या सर्व स्तरांवर तो स्वस्थ असेल तरच तो खऱ्या अर्थाने स्वस्थ असतो.

समाधान आणि आनंदाचे जीवन जगण्याची जशी कला आहे तसेच शास्त्रही आहे. शारीरिक स्वास्थ्याचा इच्छाशक्तीशी संबंध आहे. तुमच्या मनात अधिक चांगले होण्याचा आशावाद असेल, तर तुमची प्रतिकारशक्ती आपोआपच वाढेल. एखादा आजार झाला आणि तुमची वृत्ती सकारात्मक, होकारात्मक असेल तर तुम्ही आजारातून लवकर मुक्त व्हाल. तुम्ही तुमच्या मनाला ज्या सूचना द्याल त्याच सूचना मेंदूद्वारे शरीराला जातील आणि शरीरात बरे होण्याची एक स्फूर्ती निर्माण होईल; शरीरातील अनुकूल रसायन आणि रासायनिक प्रक्रियांना चालना मिळेल. विचार करणारे म्हणजे मन आणि न विचार करणारे म्हणजे तन या दोन भागांत मानवाचे अस्तित्व विभागले गेले आहे. माणसाच्या मेंदूच्या रचनेचा सातत्याने अभ्यास केला गेला आहे. आसपासच्या वातावरणाशी केवळ शरीर नाही तर शरीर आणि मन एकत्रितपणे संवाद साधतात, असे सिद्ध झाले आहे. मन आणि शरीर अद्वैत आहेत. एक आहेत. द बॉडी हॅज अ माइन्ड ऑफ इट्स ओन असे एक गमतीदार वाक्य आहे. अर्थात शरीराचेही स्वत:चे एक मन आहे.

हिंदू तत्त्वज्ञान मनावरच येऊन थांबत नाही. त्यांनी आत्मा आणि परमात्मा यांचाही विचार केला आहे. ‘मन’ विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहे, पण अध्यात्माच्या आवाक्यातले आहे.

मनातील सूक्ष्म अथवा स्थूल बदल रोगाला आमंत्रण ठरू शकतात. उतावीळपणा, गडबड, मसालेदार खाणे आणि आकारण चिंता रोगाला जन्म देतात. याचाच अर्थ स्वस्थ राहायचे असेल तर हे टाळले पाहिजे किंवा कमी केले पाहिजे. अशान्तस्य कुत: सुखम्? (गीता) म्हणजेच अशांत मनाच्या माणसाला सुख कोठून?

पौर्वात्य वैद्यकीय शास्त्रानुसार केवळ अन्न, झोप व औषध यामुळे स्वास्थ्य-लाभ शक्य नाही तर संपूर्ण व्यक्तीचा एकूण विचार करायला पाहिजे. व्यक्ती म्हटल्यावर शरीर तर आलेच, पण त्याचबरोबर मन, आत्मा, परमात्म्याशी त्याचे नाते, समाज, संस्कार सारे काही आले. आजकाल बडय़ा पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना योगासने, आयुर्वेद आणि निसगरेपचार यांचे आकर्षण वाटू लागले आहे ते यामुळेच.

आयुर्वेदात तर मनाच्या नियंत्रणावर विशेष भर दिला जातो. आयुर्वेदात दोन तत्त्वांचा विचार निदान व उपचारासाठी केला जातो. ती तत्त्वे आहेत आहार आणि विहार (जीवनशैली). आयुर्वेदानुसार व्यक्तीला ठीक करायचे आहे रोगाला नाही.

असं म्हटलं जातं की या जगात ‘दुर्धर रोग’ नाहीत,  पण ‘दुर्धर व्यक्ती’ आहेत. अशा व्यक्ती ज्या कोणत्याच उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. भारतीय वैद्यकशास्त्रानुसार तब्येत चांगली राखण्यासाठी दोन तत्त्वे महत्त्वाची आहेत. समतोल आणि नियंत्रण.

जेव्हा चिडचिडेपणा संतापात बदलतो;  जेव्हा आनंद व्यसन बनते; जेव्हा इच्छा अनावर भावना बनते तेव्हा अतिशय ताण पडतो आणि रोगाला वाव मिळतो. अर्थात भावना ताब्यात असल्यास व्यक्ती निरोगी असते, पण भावनेने व्यक्तीचाच ताबा घेतला तर व्यक्ती रोगी बनते.

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी चांगले आणि परस्परपूरक नाते प्रस्थापित करू शकत असेल तर ती स्वस्थ आहे असे म्हणता येईल. जी व्यक्ती स्वत:शी समरस असेल तीच दुसऱ्याशी समरस होऊ शकेल. स्वत:शी समरस असणे म्हणजे स्वस्थ असणे होय.

स्वस्थ जीवन म्हणजे उत्कृष्ट शारीरिक स्वास्थ्य, खणखणीत मानसिकता. स्वस्थ व्हायचे असेल तर मनाच्या शक्तीचे आणि श्रद्धेचे बळ ओळखले पाहिजे. मनाची शक्ती वाढवावी यासाठी दुसऱ्याबद्दल सहानभूती, स्वस्थ नाती-गोती, जीवनात निश्चित ध्येय, समाजात रस या गोष्टी आवश्यक आहेतच याशिवाय खेळ, काम, सृजन आणि आत्मा यांच्यात समन्वय हवा.

पथ्य :

  • शरीराला परिणामी सुखावह असणाऱ्या आहारविहारास पथ्य आणि असुखावह असणाऱ्या आहारविहारास अपथ्य म्हणतात.
  • हितभुक्  मितभक्  सोऽरुक् । (जो हितकर म्हणजेच पथ्यकर) संयमित खातो तो अरुक्  म्हणजे अरोगी; निरोगी बनतो.
  • पथ्याची व्याख्या : पथ = आरोग्याचा मार्ग. म्हणजेच आरोग्याच्या मार्गाला सोडून जे नाही ते पथ्य होय.
  • औषध आणि उपचार यांना साहाय्यभूत होणारा आहारविहार = पथ्य.
  • पथ्य पाळा, खर्च वाचवा, दु:ख टाळा.

    वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com