Car Driving Tips In Monsoon : पावसाळ्यात वाहन चालविणे फार जिकिरीचे काम असते. पाण्याने भरलेले रस्ते, रस्त्यात खड्डे अन् वाहतूक कोंडी यांमुळे पावसाळ्यात वाहनचालकांना खूप सावधणपणे वाहन चालवावे लागते. विशेषत: खूप पाऊस असताना सुरक्षितरीत्या वाहन न चालविल्यास अपघाताची दाट शक्यता असते. त्यामुळे थोडी खबरदारी घेऊन वाहन चालविणे गरजेचे आहे.

शक्यतो अतिवृष्टी झालेल्या भागांतून प्रवास करणे टाळा; परंतु काही वेळा कामानिमित्त त्या भागांतून जाणे आवश्यक असल्यास गाडी अतिशय सावकाश आणि सर्वांत कमी गिअर ठेवून चालवा. खूप पाणी साठलेल्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत इंजिन बंद होऊ देऊ नका; अन्यथा एक्झॉस्ट सिस्टीममध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडण्याची शक्यता असते.

पाणी साठलेले असल्यास टाळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न / वाहन ‘टो’ करून, मेकॅनिककडे नेणे उत्तम!

जर रस्त्यावर पाणी साठले असेल किंवा तुमच्या कारचे इंजिन चिखलामुळे बंद पडले असेल, तर ते सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण- तसे केल्यास तुमच्या वाहनाचे आणखी नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत वाहन ‘टो’ करून, मेकॅनिककडे नेणे हाच उत्तम पर्याय आहे.

गाडीतून क्षमतेइतकेच सामान न्या

पावसाळ्यात गाडी कधीही ओव्हरलोड करू नका. कारण- पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावर ओव्हरलोड गाडीचा तोल जाऊन, अपघात होऊ शकतो. त्यामुळे गाडीच्या क्षमतेनुसारच त्यात सामान लोड करा.

हॅजार्ड लाइट्सच्या मदतीने चालवू नका गाडी

तुम्ही चालत्या कारमध्ये हेजार्ड लाइट्सचा वापर करणे टाळले पाहिजे. कारण- तुम्ही कोणत्या दिशेला वळाल याचा अंदाज तुमच्या गाडीमागे असणाऱ्या वाहनचालकाला नसतो. खूप जास्त पाऊस असल्यास गाडी चालवणे अवघड झाले, तर हेडलाईट चालू करून रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबा.

पंपावर पेट्रोल, डिझेल भरताना घ्या काळजी, अन्यथा तुमच्याबरोबरही होऊ शकते ‘अशी’ फसवणूक

गाडीचा वेग २० किमीपेक्षा कमी ठेवा

मुसळधार पावसाळ्यात तुम्ही रोज ज्या वेगाने गाडी चालवता त्यापेक्षा कमी वेगाने गाडी चालवा. अशा वेळी २० किमीपेक्षा कमी वेगाने गाडी चालविणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे कार स्लीप होण्याचा धोका कमी होतो. तसेच काही वेळा पावसाळ्यात ब्रेकची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे वेग कमी असल्यास ब्रेकवर कमी दाब पडेल आणि अपघाताची शक्यता टळेल.

पावसाळ्यात तुमच्या वाहनातील तपासून घ्या ‘या’ गोष्टी

पावसाळ्यात तुमच्या कारमध्ये वायपरचे नवीन सेट बसविणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय वॉशर फ्लुइडदेखील टॉप अप करायला विसरू नका. कारच्या टायरचे लाइफ किमान ३० ते ४० टक्के शिल्लक राहणे आवश्यक आहे. तेवढे ते सक्षम नसल्यास, ते बदलणे फार गरजेचे आहे. कारण- गुळगुळीत झालेले टायर ओल्या रस्त्यावर चांगल्या प्रकारे ग्रिप पकडू शकत नाहीत.