पावसाळ्यात रस्ते निसरडे होणे, धुकं दाटून रास्ता अंधुक दिसणे, दरड कोसळणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे घाट रस्त्यांमध्ये अपघाताची शक्यता असते, मात्र तुमचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असतात. तसेच, गाडी चालवताना योग्य गियरचा, ब्रेक्स आणि दिव्यांचा वापर करणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. पावसाळ्यात घाट रस्त्यांवर गाडी चालवताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या पाहा.
१. योग्य गियरचा वापर करा
घाट रस्त्यांमध्ये किंवा चढावर असताना वाहन चालवताना खालच्या [सर्वात कमी] गियरमध्ये गाडी चालवणे फायदेशीर ठरू शकते. गाडी उतारावर असताना, वाहन अधिक वेगवान असते. अशावेळेस वाहनावर उत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी गाडी योग्य गियरमध्ये असणे आवश्यक असते.
२. योग्य ब्रेक्सचा वापर
गाडी उतारावरून खाली येत असताना, पॅडलने ब्रेक मारण्यापेक्षा इंजिन ब्रेकिंग पद्धत सर्वात उपयुक्त ठरू शकते. उतारावर गाडी चालवत असताना, सतत पॅडल ब्रेक मारल्याने, ब्रेक पॅड गरम होऊन खराब होऊ शकते. परिणामी ब्रेक फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे, उतारावर खालच्या गियरमध्ये गाडी चालवून, इंजिन ब्रेकिंग पद्धतीचा अवलंब करू शकता.
३. वाहतूक नियम पाळा :
रस्त्यावरील चिन्ह पाहा
डोंगराळ भागात गाडी चालवताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या चिन्हांकडे लक्ष देऊन त्यांचे पालन करा. अशी चिन्ह रस्त्यावर पुढे कोणत्या गोष्टी येऊ शकतात, पुढे रास्ता कसा आहे या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती देत असतात.
लेनची शिस्त पाळा :
ये-जा करणाऱ्या वाहनांनी रस्त्याच्या कोणत्या भागातून गाडी चालवावी यासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवलेल्या असतात हे आपण पहिले आहे. घाट हे वळणावळणांच्या रस्त्यांनी भरलेले असतात. अशा वेळेस लेनचे नियम मोडल्यास, चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवल्यास अपघाताची संभावना अधिक असते. प्रवास सुरक्षितपणे करायचा असल्यास, तीव्र आणि नागमोडी वळणांवरचे अपघात टाळायचे असल्यास प्रत्येक चालकाने लेनचे नियम पाळावे.
यासर्वगोष्टींव्यतिरिक्त, पावसाळ्यात, घाटामध्ये किंवा वळणाच्या रस्त्यांवर विनाकारण वेगाने गाडी चालवणे टाळावे.
तसेच, ओव्हरटेक करू नये. ब्रेक्सप्रमाणे, वाहनाच्या दिव्यांनीदेखील चालक एकमेकांना सूचना देण्याचे काम करू शकतात. अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखानुसार समजते.
[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.]
© IE Online Media Services (P) Ltd