नीलिमा शशिकांत नाडकर्णी
वर्षा आणि तिच्या घरातले सारेजणच त्या दिवशी आनंदात न्हाऊन निघाले होते. कारणही तसंच होतं. ‘विज्ञान सभे’तर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय विषयावरील निबंध स्पर्धेत राज्यातील स्पर्धकांमध्ये वर्षाला प्रथम क्रमांक मिळाला होता. वर्षाबरोबरच तिच्या शाळेचं नावही उज्ज्वल झालं होतं. तिची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांना हे यश अभिमानास्पद वाटत होतं. शाळेतर्फे त्या दोघांचाही सत्कारदेखील करण्यात आला होता. शाळेतील समारंभानंतर घरी आल्यावर तिला बाबा म्हणाले, ‘‘वर्षा, इतकं छान यश मिळवलंस! आता त्याबद्दल आम्हीही तुला बक्षीस देणार आहोत. तेव्हा तुला काय हवं ते सांग.’’

‘‘खरंच वर्षा! मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू! अभिमान वाटतो तुझा! तुला काय पाहिजे ते माग.’’ आई आनंदाने म्हणाली.

‘‘मी सांगतो तिला काय हवं असेल ते!’ वर्षाचा भाऊ विवेक म्हणाला, ‘‘तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीसारखा नवा ड्रेस, नाहीतर नेकलेस, ब्रेसलेट असलं काहीतरी!’’

‘‘तू गप्प बस रे! उगीच चिडवू नकोस तिला.’’ विवेकला दटावीत आई म्हणाली, ‘‘वर्षा, तू सांग ना!’’

‘‘बंधुराज, तू म्हणतोस तसलं मी काहीच मागणार नाही हं कळलं.’’

वर्षाच्या या बोलण्यावर आईनं तिला पुन्हा विचारलं, ‘‘तुला दुसरं काय हवंय? कुठे ट्रीपला वगैरे जायचंय का?’’

‘‘नाही आई! ट्रीपदेखील नकोय, पण मला जे हवं ते तुम्ही नक्की देणार ना?’’

‘‘म्हणजे काय? आपला शब्द म्हणजे शब्द! पण असं काय मागणार आहेस ते लक्षात येत नाही बुवा!’’ बाबा हसतच म्हणाले.

‘‘बाबा, आई, मला ना झाडं लावायची आहेत. म्हणून मला हवी ती चार- पाच रोपं नर्सरीमधून घेऊन द्याल?’’ वर्षानं सांगितलं.

‘‘अॅहॅ! काय पण! हे काय बक्षीस झालं?’’ विवेकनं पुन्हा मध्येच नाक खुपसलं.

‘‘हो, हो! हेच बक्षीस हवंय मला बरं का बंधुराज!’’ वर्षानं त्याच स्वरात उत्तर दिलं.

‘‘अगं, पण कुठली रोपं हवी आहेत तुला?’’ वडिलांनी प्रश्न केला.

‘‘बाबा, मला ना उंबर, वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ अशी झाडं हवी आहेत.’’ वर्षानं सांगितलं.

‘‘अगं, पण लावणार कुठे ती. आपल्या अंगणात अशी मोठी झाडं लावण्याएवढी जागा कुठे आहे?’’ आईनं शंका काढली.

‘‘बाप रे! असली झाडं कशाला ग तायडे?’’ तिला चिडवायची एकही संधी विवेक सोडत नव्हता!

आईनं सुचवलं, ‘‘त्यापेक्षा गुलाब, मोगरा, निशिगंध अशी रोपं कुंडीत लावू या ना!

‘‘आई, कुंड्यांमध्ये हवी तर ती फुलझाडं लावू या. पण मला ही मोठमोठ्या झाडांची रोपं हवी आहेत, ती आपल्यासमोरच्या ‘सुभाष’मैदानाच्या कडेला चारी बाजूंनी एकेक झाड लावायला.’’ वर्षानं आपल्या मनातलं सांगितलं.

‘‘हो, पण तायडे, हा उद्याोग कशाला हवाय तुला?’’ विवेक बडबडलाच!

‘‘अरे, अशी झाडं मोठी झाली की छान सावली देतात. पक्ष्यांना या झाडांवर बसता येतं, घरटी बांधता येतात आणि उंबराची, वडाची फळं खाऊन पोट भरता येतं.’’

‘‘बाप रे! तायडे बक्षीस मिळाल्याबरोबर अगदी मोठ्या माणसांसारखी बोलायला लागलीस की!’’ विवेकनं पुन्हा नाक खुपसलं!

‘‘आई-बाबा, मी मागते ते चुकीचं आहे का?’’ वर्षा म्हणाली.

‘‘मुळीच नाही! उलट तू पर्यावरणाचा इतका विचार करतेस याचंच कौतुक वाटतं! वडिलांच्या म्हणण्यावर आईनंही दुजोरा दिला. ‘‘स्वत:साठी काही न मागता हे बक्षीस मागितलंस याचंच कौतुक वाटतं बघ!’’

‘‘आता पावसाला सुरुवात झाली आहे, तेव्हा आपण उद्याच नर्सरीतनं झाडं आणून लगेच ती लावू या. पावसात ती छान रुजतील. मी आताच नर्सरीत जाऊन ऑर्डर देतो. त्यांच्याकडे नसली तर दुसरीकडून आणून देतील.’’

बाबांच्या बोलण्यानं वर्षा खूष झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षा – आई – बाबा – विवेक सगळेच नर्सरीत गेले आणि त्यांना हवी ती रोपं घेऊन आले. विवेकने सोसायटीच्या माळ्याकडून कुदळ घेतली होती.

‘‘बाबा, विवेक कुदळीने खणून इथे खड्डा करील. मग आईच्या हस्ते पहिलं झाड लावून शुभारंभ करू या,’’ वर्षाने सांगताच बाबा जोरात हसले आणि म्हणाले, ‘‘समोर बघ – कोण शुभारंभ करायला येतंय ते दिसेल.’’

तिने समोर पाहिलं आणि तिला प्रचंड आनंद झाला. तिच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्पर्धेसाठी तिची तयारी करून घेणारे शिक्षक येत होते.

‘‘बाबा, तुम्ही बोलावलंत त्यांना?’’ वर्षाच्या या प्रश्नावर बाबा म्हणाले, ‘‘अर्थात!’’ खूश झालेल्या वर्षाने सरांजवळ जाऊन वाकून नमस्कार केला.

‘‘वर्षा, तुझ्या वडिलांनी आम्हाला तुझी कल्पना सांगितली आणि ऐकून अभिमान वाटला!’’ मुख्याध्यापक म्हणाले.

दुसरे शिक्षक म्हणाले, ‘‘निबंध स्पर्धेत अगदी योग्य मुलीला बक्षीस मिळालं!’’

सगळ्यांच्या सहभागामुळे वृक्षारोपणाचा वर्षाचा आनंद शतपटीने वाढला!!

lokrang@expressindia.com