एका छोटय़ाशा गावात राजाराम राहत होता. त्याच्याकडे एक कुत्रा होता, त्याचं नाव लिओ. लिओ खूप हुशार आणि इमानदार होता. तो घराची राखण करायचा. घरात कोणीही आलं की तो लगेचच भुंकायचा, म्हणूनच तो राजारामचा लाडका होता.

एके दिवशी काय झालं की, रात्रीच्या वेळी घरात एक चोर शिरला. चोराची चाहूल लागताच लिओ लगेचच भुंकू लागला. पण तो चोर धूर्त होता. लिओनं भुंकायला सुरुवात करताच तो चोर लगेचच पळून गेला. राजाराम झोपेतून उठून बाहेर आला; परंतु त्याला कोणीच दिसलं नाही. आपली झोपमोड झाल्यामुळे त्याची चिडचिड झाली. पण लिओला कसलातरी भास झाला असेल म्हणून तो काही बोलला नाही. पण आणखीन दोन-तीन वेळा असंच घडलं. एकदा राजारामनं लिओला रागानं मारलं. मालकानं आपल्याला मारलं म्हणून लिओला खूप वाईट वाटलं. पण त्या चोरामुळेच आपल्याला मार बसला, हेदेखील लिओच्या लक्षात आलं.

मग लिओनं एक युक्ती करायची ठरवलं. एके दिवशी रात्री घरात चोर शिरला तेव्हा लिओ भुंकलाच नाही. तो डोळे मिटून राहिला. चोर आणखी थोडा आत आल्यानंतर लिओनं भुंकायला सुरुवात केली. तो भुंकायला लागताच चोर पळून जाऊ लागला; पण तितक्यात लिओनं त्याची पॅन्ट पकडली. तोपर्यंत लिओचा आवाज ऐकून राजारामदेखील तिथे आला आणि अखेरीस त्याला चोर सापडला. त्यानं पोलिसांना फोन करून चोराला पोलिसांच्या तावडीत दिलं. राजाराम लिओचा हा पराक्रम आपल्या मित्रांजवळ सांगून त्याचं कौतुक करू लागला.

राज्वी चंद्रकांत पवार, इयत्ता ७ वी.