– चंद्रशेखर टिळक

गेल्या १० -१५ दिवसातल्या ह्या सगळ्या घटना ….
१. ११ डिसेम्बर २०१८ रोजी पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.
२. अँडलेड क्रिकेट कसोटीत विराट कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३१ धावांनी पराभूत केले.
३. १ डिसेम्बर २०१८ पासून आपल्या मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकात झालेले वादळी बदल.

सहजच मनात आले की या तिन्ही घटकांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नसला तरी यांत किती साम्य आहे ना…
आणि फरकही….

मिझोराम, तेलंगण, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ११ डिसेम्बरला जाहीर झाले. यांपैकी मिझोराम आणि तेलंगणा या राज्यात विद्यमान सरकारे केंद्रात सतारुढ असलेल्या भारतीय जनता पक्षाची नव्हती. या निवडणुकीत ती येण्याची सुतराम शक्यता नव्हती. या दोन्ही विधानसभात, विशेषतः मिझोराम मधे भाजपाने खाते उघडले तरी पुष्कळ अशी परिस्थिती होती. तसेच झाले या दोन्ही राज्यात. झाला तो निव्वळ फायदा.. शेअरबाजाराच्या भाषेत “Net Gain”…. क्रिकेटच्या परिभाषेत कसोटी क्रिकेट मधे रोहित शर्मा खेळणे… एक चांगला झेल घेतला ना….उत्तम. तेवढे तर तेवढे ….कोण तरी म्हणे त्यातल्या त्यात ….असला सगळा मामला ….जे काही मिळेल ते पदरात पाडून घेणे असल सगळ ….निवडणुका , क्रिकेट , शेअरबाजारात ( मोदी , कोहली , शेअरबाजार )’यांत हे साम्य….आवळा देऊन कोहळा काढता येईल अशी जरासुद्धा शक्यता नसण्याची ….
छत्तीसगड विधानसभेत जे आत्ताच्या निकालात झाले ते अगदीच एकदमच अनपेक्षित …..रेवती रमण सिंग यांनी खरंच खूप चांगले काम केले होते आणि आहे ….२०२४ च्या निवडणुकीत ते कोणत्याही पदाचे उमेदवार असण्याची शक्यता, त्यांचे वय बघता, शक्यता नाही. केंद्र सरकारच्या योजनांचा व्यवस्थित उपयोग करून घेत राज्याचा गेली १५ वर्षे हा मुख्यमंत्री राज्याचा विकास करत होता. उत्तराखंड , झारखंड आणि छत्तीसगड ही तीन स्वतंत्र राज्य म्हणून साधारणतः एकाचवेळी अस्तित्वात आली. या तीन राज्यातच नव्हे तर एकंदरीतच देशभरात गेली अनेक वर्षे सर्वात जास्त दराने विकास करणाऱ्या पहिल्या तीन राज्यात छत्तीसगडचा क्रमांक लागतो आणि गेली १५ वर्षे डॉ. रेवतीरमण सिंग उर्फ चावलवाले बाबा मुख्यमंत्री आहेत. अशावेळी कदाचित त्यांच्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत असा पराभव होणे हे अनुचित वाटते…. अगदी अडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात चांगला सेट झालेला असताना अजिंक्य राहणेने रिव्हर्स स्वीप मारत बाद होण्यासारखे ….. अजिंक्य राहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे “चावलवाले बाबा” आहेत…. रेवती रमणसिंगांसारखेच फालतू बडबड न करता आपले निहित काम करत राहणारे ….हे भाषण सुद्धा आरडाओरड करून करत नाहीत….तर हे किंवा यांच्या पत्नी काय चर्चाप्रवण सेल्फी काढणार !
रेवतीरमणसिंग – अजिंक्य राहणे – चेतेश्वर पुजारा यांचे शेअरबाजारातले सम – व्रुत्तीन म्हणजे लार्सन टुब्रो, एचडीफसी, एचडीफसी बँक, कस्ट्रोल, रलीस सारखे शेअर्स… त्या निर्देशांकात काय व्हायचे असेल ते होवो, ही सगळीच मंडळी म्हणजे आपण बरं आणि आपलं काम बरं अशी ….चेहऱ्यावर आणि वागण्यातही एक “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” अशी …. त्यामुळे ना यांपैकी कोणाला ” मित्रो ssss” अशी साद घालावी लागत, ना अध्यक्ष महाराज असं प्रत्येक वाक्यात तीन – चारदा म्हणत स्वभावापेक्षा वेगळे वागत कविता म्हणावी लागत…. यांच्यापैकी कोणीच flashy नाही. flamaboyant नाही…. आणि म्हणूनच जनता – जनार्दन यांना साद घालते… एकमेकांना एकमेकांच्या मर्यादा माहिती असूनही…. कारण हे सगळेच स्वतःचाही आब राखून असतात आणि पुढच्याचाही…. त्यामुळेच यांच्यापैकी कोणाचही तोंडघशी पडणे जिव्हारी लागते… त्यांचे माहिती नाही… आपल्या सगळ्यांच्या नक्कीच !

अडलेड क्रिकेट कसोटीत कसं पहिल्या डावात अजिंक्य राहणे नावाचा चावलावाला बाबा जरी चालला नाही, तरी चेतेश्वर पुजारा नावाचा चावलवाला बाबा दोन्ही डावात चालला.( दुसऱ्या डावात पुजारा – राहणे हे दोन्ही बाबा चालले.) ….आत्ता विधानसभा निवडणुकीत डॉ . रेवतीरमणसिंग छत्तीसगडमधे चालले नसले तरी मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान चालले तसे. अगदी तसेच.

तसंही अडलेड कसोटीतली चेतेश्वर पुजाराची फलंदाजी आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात तसंही साम्य आहे….दोन्ही ठिकाणी पुजारा आणि शिवराजसिंह त्यांच्या त्यांच्या गटांचे तारणहार ठरले…पण शतक झाले नाही पुजाराचे आणि बहुमत काही मिळाले नाही शिवराजसिंहना !

पुजारा , राहणे आणि शिवराजसिंह मनोमन हेच म्हणत असतील की कर्नाटक निवडणुकानंतर केला तसा अतीसाहसवाद नको करू देत म्हणजे मिळवलं ….

कारण भाजप काय, क्रिकेट काय आणि शेअरबाजार काय….खेळतात वेगळेच आणि छळतात वेगळेच….

सगळेच थोडेच गोवा – गडकरी – पर्रीकर असतात ….तसंही पर्रीकर यांची तब्येत पाहून धस्स होतं ….कोणाचीही नजर नको लागायला.

असे पुजारा – राहणे आणि शिवराजसिंह शेअरबाजारातही असतातच की ! आणि आत्ताच्या या बाजारातही आहेतच की ! ! ! !
रोहित शर्मा त्याच्या वकूबानुसार सातत्याने कसोटी क्रिकेट मधे खेळणं हे अयोध्येत राममंदिर होण्यासारखे आहे…अशक्य नाही; पण कधी होईल ते सांगता येतं नाही … कदाचित त्यांचे त्यांनाही नाही. सवडी- सवडीने धूळ साचू द्यायची आणि सोयी – सोयीने झटकत राहायचे असे हे विषय …एकदम तू रडल्यासारखे कर आणि मी मारल्यासारखे करतो असे कोहली आणि रोहित शर्मा यांपैकी कोण कोणाला म्हणते हे कळत नाही. आणि तसेच मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही…. कारण आपण सगळे भावनिक गुंत्यात अडकायला सदैव तयारच असतो याचं पूरेपूर भान या सगळ्यांना आहे…. अगदी शेअरबाजारात सुद्धा.

त्यामुळे रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचे राममंदिर आहे की राममंदिर हे भारतीय राजकारणाचा रोहित शर्मा आहे कोण जाणे !
सगळेच राहुल राहुल द्रविड नसतात. नसतातच.
पण अलिकडचे राहुल कधी कधी पावतात ….या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी कॉंग्रेसला पावले तसे आणि अड्लेड क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात काही प्रमाणात के. एल. राहुल पावला तसा… निदान आता ” पप्पू “म्हणताना जरा विचार करायला लागावा असा ( करायचा असला तर ! )
सध्याच्या वादळी बाजारात असे काही राहूल पावले आहेतच की!
अडलेड क्रिकेट कसोटी भारतीय संघ जिंकला, जेमतेम ३१ धावांनी. ऑस्ट्रेलियाची आजपर्यंतची सगळ्यात दुबळी फलंदाजी वगैरे ज्यांचे वर्णन केले जाते होते त्या संघाविरुद्ध ….त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आपल्यावर रडायची वेळ आणली होती. …अश्विन दुसऱ्या डावात एक विकेट मिळवायला झगडत असताना ऑस्ट्रेलियाचा नथन लायन सहा विकेट घेत होता…. जिंकले असले तरी केवळ नावात विजय आहे म्हणून कोणी ….क्रिकेट संघात दुसऱ्या कसोटीसाठी काही बदल करावे लागतील …धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल ….
पाचपैकी एकही विधानसभा निर्विवादपणे हाती येतं नाही असं असताना. शेअरबाजाराचा तर प्रश्नच नाही …इथे सदैवच ” Past performance is not A gurantee….”.