साऊथ ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरात असलेलं,अॅडलेड ओव्हल मैदान. २०१४ साली अॅडलेड कसोटीमध्ये विराट कोहलीच्या झुंजार खेळीमुळे अशक्य वाटणारा विजय जवळ आला होता….पण निथॉन लिओनमुळे फासे उलटले आणि आपण हरलो. या मैदानावर भारत आत्तापर्यंत ११ कसोटी सामने खेळला. अॅडलेड म्हणल्यावर ‘सर्वांच्या मनात खोलवर रुजलेली, क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रीय असा एकच कसोटी सामना आपल्या समोर येते तो म्हणजे २००३ च्या दौऱ्यातला दुसरा कसोटी सामना.

लिजेंडरी राहुल द्रविडनी केलेल्या ३०० हुन अधिक धावांमुळे एक ऐतिहासिक विजय भारताला मिळवता आला होता. ह्या विजयाचं महत्व खूप वेगळं आणि मोठं होतं. १९९९ साली ऑस्ट्रेलियन दौऱ्यात बघावा लागलेला ३-० असा दारुण पराभव आणि प्रत्येक महत्वाच्या फलंदाजांना आलेलं अपयश ह्या दोन्ही गोष्टी टीममधल्या प्रत्येकाच्या मनात सलत होत्या. इतकंच काय तर तुमच्या आमच्यासारखे पाठीराखेसुद्धा २००३ च्या दौऱ्याकडे निगेटिव्ह फ्रेम ऑफ माईंडनी बघत होतं. सेहवाग,द्रविड,सचिन,गांगुली,लक्ष्मण,कुंबळे असे सगळेच दिग्गज खेळत होते पण तरीसुद्धा मनात धाकधूक होतीच.

अॅडलेड कसोटी सामना हा २००३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला दुसरा कसोटी सामना होता. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. सकाळी ५ वाजता गजर लावून आम्ही उठलो,नाणेफेक झाली…..ते टॉस जिंकले होते. आपली पहिली बॉलिंग आली होती, इथेच शंकेची पाल मनात आरडाओरड करायला लागली. येईल तो फलंदाज आपल्याला सीमापार पाठवत होता. पहिला दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियानी तब्बल ४०० धावा चोपल्या होत्या. आपला सर्वांचा ‘लाडका’ रिकी पॉन्टिंग १७६ वर नाबाद होता. दिवडभर यथेच्छ धुलाई करूनसुद्धा त्याच जोशात खेळत होता. सिरीज सुरु व्हायच्या आधी जी भीती आपल्याला वाटत होती ती खरी होतीये की काय असं वाटू लागलं, किंबहुना आपण आता गेलोच अशी खात्री पटली. दुसऱ्या दिवशी पॉन्टिंगनी पुन्हा आपला समाचार घेतला, त्याने एकट्याने २४२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियानी ५५६.

काहीही झालं तरी आमच्या या योध्यांवर आमचा नेहमीच पुर्ण विश्वास. पहिल्या दिवशीच्या हाराकिरीनंतर सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी ५ वाजता उठून आपली होणारी धुलाई निराश नजरेनी, डोळे किलकिले करत बघत बसलो होतो. पॉन्टिंगनी मारलेला प्रत्येक चौकार आमचं डोकं ब्लॅंकेटचे आत लपवायचा. घरात आई, बाबा, मोठी भावंडं, आपली टीम हरल्यावर चिडवणारे ते टिपिकल नातेवाईक, मित्र या सगळ्यांच्या चेहऱ्यावर “कशाला उठतो आणि बघतो रे ह्यांचा पडेल परफॉर्मन्स???” असे काही प्रश्न होते. पण पहाटे उठून त्या मॅचेस बघणं हा आपला नशा होता ह्यातून बाहेर येणं अवघड आहे… पण त्यांना कोण सांगणार!

एकदाची ऑस्ट्रेलियन फलंदाजी संपली. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ च्या आसपास आपली फलंदाजी सुरु झाली होती. हातातले कांदे पोहे बाजूला ठेवून पुन्हा मॅच बघायला लागलो. सेहवाग तुफान बडवत होता, भारत ६६ वर नो लॉस…तेसुद्धा ऑस्ट्रेलियात! फार दुर्मिळ चित्र होतं ते. पूर्वी देवांग गांधीसारखी मंडळी खेळायची तेव्हा हे असं फारसं घडायचं नाही. पण भारतीय फलंदाजीचं एक शास्त्र आहे, कोणी कौतुक केलं की लगेच आऊट व्हायचं. आम्ही खुश होतोय तेवढ्यात सेहवाग, आकाश चोप्रा, तेंडल्या आणि गांगुली लगेच आऊट झाले. एकदम हजेरी लावून, ६६ फॉर नो लॉस वरून ८६ ला ४ आउट. त्यात वाईट गोष्ट म्हणजे गांगुली रान आउट झाला होता. टेस्ट मॅच मध्ये रन आउट होणं म्हणजे आपल्यासकट टीमच्या ११ लोकांच्या पायांवर धोंडा पडण्यासारखा आहे. मनात काळजी आणि संताप दोन्ही भावना एकमेकेंशी लढाई करत होत्या. आता समोर द्रविड आणि लक्ष्मण होते, आणि भारत अजूनही ४८० रन्सनी मागे होता.

एकूणच माझ्या डोळ्यावरच टेन्शन बघून आईनी भाजी आणि इतर काही वाण्याचं सामान आणायला खाली पाठवलं. द्रविडचा लो कॉन्फिडन्स बघून टीव्ही सोडवत नव्हता… खाली दुकानात गेलो तिथे मॅच सुरु होती. दुकानदार रिअल इंडियन फॅन होता. “ये दोनो फिरसे कलकत्ता जैसे खेलेंगे…” बस्स! मी त्या भाजीवाल्याचा लाईफ टाइम फॅन झालो. त्या दिवशी भीतीमध्ये मी इडन गार्डन्स विसरून गेलो होतो…त्या दुकानदाराच्या एका वाक्यानी माझ्यात ऊर्जा संचारली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याच दुकानात मॅच बघत राहिलो. दोघेही इतके छान सेट झाले होते…आपण जागा चेंज करायचो आणि त्याची शिक्षा त्या दोघांना मिळायची. दुसरा दिवस संपला, आपण १८० ला ४ आउट होतो. द्रविड ४३ तर लक्ष्मण ५६ वर खेळत होते, थोडंसं हुश्श झालं होतं.

तिसरा दिवस, फार महत्वाचा… ह्या दोघांनी काल वेळ मारून नेली होती पण अजूनही आपण ३८० धावांनी मागे होतो. आमच्याच खांद्यावर जबाबदारी असल्यासारखे आम्ही ४ वाजता उठून बसलो. पोटात गोळा होता पण आत खोलवर काहीतरी चांगलं घडणारे असा विश्वास होता. द्रविड-लक्ष्मण सुरु झाले. आधी चाचपडत आणि मग राजासारखे खेळायला लागले. प्रत्येक बॉलला इडन गार्डन्सची आठवण करून देत होते. तब्बल २ सत्र त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मैदानाच्या सर्व दिशांना फटकारलं. लक्ष्मण १४८ वर आउट झाला आणि दिवस अखेरीस द्रविड १९९ वर नॉटआउट होता. भारत ४७७ वर ७ आउट. एकदम आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स होता आपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्याच धरतीवर असं नामोहरम झालेलं बघायला भारी मजा येत होती. आत्तापर्यंत पाहिलेल्या क्रिकेटमधला तो दिवस आणि ती रात्र सगळ्यात भारी गेली होती.

दिवसभर टीव्हीसमोर हललो नाही आणि तरीसुद्धा पुढच्या दिवशी पहाटे चार वाजता उठण्यासाठी व्हॅलिड कारण होतं ते म्हणजे राहुल द्रविड. द्रविडच्या संपूर्ण १९९ रन्स बघितल्यानंतर त्याची २०० वी रन बघायची नाही हे म्हणजे चितळ्यांच्या लाईनमध्ये उभं राहून आंबा बर्फी न घेतल्यासारखं होतं. ती एक रन बघण्यासाठी सलग चौथ्या दिवशी पहाटेचा गजर लागला,साहेबांचे २०० झाले…मन समाधानी झालं. भारत ५२३ वर ऑलआउट झाला आणि द्रविड २३३ वर. चौथा दिवस सुरु झाला होता, पीच अजून सुद्धा बॅटिंगसाठी चांगलं होतं. त्यामुळे आपण फर्स्ट इनिंगमध्ये लीड घेऊ शकलो नाही पण तरीसुद्धा ‘आता मॅच हरणार नाही’ ह्याची खात्री पटली होती. आता एकदम निर्धास्तपणे मॅच बघायला सुरवात झाली होती. ब्लँकेटमध्ये लपलेला चेहरा एकदम कॉन्फिडन्टली सोफ्यावर बसून, पाय पसरवून मॅच बघू लागला होता.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सचिनच्या गोलंदाजीवर द्रविडने घेतलेले कॅच म्हणजे ही मॅच फक्त आणि फक्त द्रविडची आहे असं सांगणारे होते. यावर शिक्कामोर्तब केलं ते त्याच्या दुसऱ्या इनिंगमधल्या २४ कॅरेट पेक्षा मौल्यवान अशा ७२ रन्सनी. इतिहास रचायला २३० धावांची गरज होती. वीरूभाईंनी जोरदार सुरुवात करून दिली… ४७ धावांवर तो आउट झाल्यावर द्रविडने हक्काने सगळी सूत्र आपल्या हाती घेतली. वीरूच्या त्या कॉन्फिडन्ट सुरुवातीचा टीमवर खूप वेगळा आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असे. त्याची आक्रमकता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना एक पाऊल मागे न्यायची आणि त्याचाच फायदा द्रविड करून घेत असे. सचिन आणि लक्ष्मणबरोबर द्रविडने पार्टनरशिप करत हळू हळू आपल्याला २३२ ह्या जादुई आकड्याच्या जवळ नेलं. काय स्टॅमिना असावा त्या माणसाचा.

५ दिवसांच्या मॅच मध्ये हा ४ दिवस ग्राउंडवर होता. अंगात चिकाटी होती आणि डोळ्यसमोर २३० रन्सच ध्येय. असं म्हणतात चौथ्या इनिंगमध्ये लक्ष जेव्हढं छोटं असतं तेवढंच ते अवघड असतं,चकवा देणारं असतं. द्रविडनी आपला संपूर्ण अनुभवपणाला लावून संघाला इथपर्यंत आणलं होतं. अखेरीस २२९ वर असताना त्यांनी मॅकगिलला स्क्वेअरकट मारला, इंडिया हॅज वन!!! भारत तब्बल २२ वर्षांनी ऑस्ट्रेलियात जिंकला होता. ‘त्याची नजर पॅव्हिलिअनकडे गेली, हात उंचावले गेले, टोपीवरच्या झेंड्याला किस केलं गेलं आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी घर केलं. अॅडलेड ओव्हलवर इतिहास घडला होता. चॅपल हॅट्स परिधान केलेला चॅपल स्टॅन्डदेखील ‘हॅट्सऑफ’ करत होता तर संपूर्ण अॅडलेड ओव्हल स्टँडिंग ओव्हेशन देत होतं…ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर डोळ्यात पाणी आलेला तो द्रविड लाखो भारतीयांना आयुष्यभर पुरेल अशी ऐतेहासिक आठवण देऊन गेला होता.