काही सिनेमांची मांडणी साधी सोपी दिसते. पण सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममधून खुप काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलेला असतो. फ्रान्समधला तत्ववेत्ता मायकेल फुको म्हणतो, सिनेमाची प्रत्येक फ्रेम ही राजकीयच असते. दिग्दर्शक शाहरुख खान चावडाचा ‘कयो कयो कलर’ (२०२३) पाहताना हे सतत जाणवत राहतं. शाहरुखचा हा सिनेमा गुजरातच्या अहमदाबादमधल्या कालुपूर या वस्तीत घडतो. तिथं राहणाऱ्या रझाक आणि त्याच्या कुटुंबियांना दाखवतो. यांच्या रोजच्या जगण्याची ही गोष्ट. या मुस्लिम कुटुंबाच्या माध्यमातून शाहरुखनं २००२ ते २०१६ या कालावधीत गुजरातमधल्या मुस्लीम समाजाला भोगाव्या लागलेल्या भोगाचा वेध घेतलाय. दहशत, बेरोजगारी, नवीन स्वप्न आणि त्यासाठीचा संघर्ष हे असं बरंच काही ब्लॅक एन्ड व्हाईट फ्रेम्सच्या माध्यमातून समोर येतं. लांबलचक स्टॅटिक फ्रेममधलं कथानक प्रेक्षकाला अस्वस्थ बनवतं. पुढे काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोचते आणि ती परमोच्च बिंदुवर असताना सिनेमा संपतो. खरंतर त्यानंतर विचारांची खरी प्रक्रिया मनात तयार होते. सिनेमा काही दिवस मनात घोळत राहतो. अप्रत्यक्षरित्या सिनेमात दिसलेला हिंसाचार, घुसमट आणि स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या मुख्य पात्रं सतत डोक्यात घुमत असतात. हेच ‘कयो कयो कलर’ (२०२३) चं खरं यश आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या रॉटरडम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची वर्णी लागली. येत्या काळात महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये ‘कयो कयो कलर’ (२०२३) दिसेल.

शाहरुख खान चावडा आणि वफ़ा रेफाई या दोन तरूण दिग्दर्शक आणि निर्माता जोडीनं ‘कयो कयो कलर’ (२०२३) बनवलाय. अगदी मन लावून. कालूपूरच्या एका मुस्लीम वस्तीत राहणाऱ्या रझाकच्या १०-१२ वर्षाच्या मुलीला, रफाला, १०० रुपये किंमत असलेलं कोल्डड्रींक घ्यायचंय. संपूर्ण सिनेमाभर तिला ते १०० रुपये मिळवण्यासाठी करावा संघर्ष अशी सिनेमाची साधी गोष्ट आहे. पण ती सांगताना शाहरुखनं तिचं कुटुंब, कालूपूरमधली मुस्लीम वस्तीची गोष्ट बांधली आहे. वर वर ही रफ़ा आणि तिच्या कुटुंबाची गोष्ट असली तरी ती गुजरातमध्ये राहणाऱ्या प्रत्येक निम्न मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी सांगते. या सिनेमाची कल्पना लॉकडाऊनच्या आधीची सिनेमाची सर्व तयारी सुरु झालेली असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं. नियम शिथील झाल्यावर तब्बल आठ महिने ‘कयो कयो कलर’ (२०२३)चं शूटींग सुरु होतं. शाहरुख स्वत: कॅमेरा चालवत होता. सिनेमातले सर्वच कलाकार हे पहिल्यांदा अभिनय करणारे होते. नवख्या कलाकारांचं वर्कशॉपवगैरे करायला रझाक आणि त्याच्या कुटुंबियांना वेळ नव्हता. कामगार वस्तीतली ही गोष्ट तिथंच शूट करायची होती. त्यामुळं अगदी बारीक गल्ल्यांमधून हे शूटींग पार पडत होतं.

online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
The youth living in the police headquarters are cheated with the lure of jobs
पोलीस मुख्यालयात वास्तव्यास असणाऱ्या तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडा
Ghodbunder, Citizens Ghodbunder protest,
घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या
Human chain against potholes in Nagpur
नागपुरात खड्डयांच्या विरोधात मानवी श्रृंखला
BJP Thackeray group thane,
ठाण्यात भाजप, ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा ? कोलशेतमध्ये स्थानिकांच्या रोजगारासाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा
old woman injured, leopard attack Ratnagiri Pali,
रत्नागिरी पाली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला

देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा एखाद्या समाजातल्या लोकांवर कसा परिणाम होऊ शकतो? याची दहशत नेहमी रक्तरंजीत असते असं नाही. देशात कुठ तरी घडलेली एखादी घटना भलतीकडे राहणाऱ्याच्या मनावर खोल परिणाम करते. दिग्दर्शक शाहरुखच्याबाबतीत हे असंच घडलं. एनआरसीवरुन देशातल्या मुस्लीम समाजात तयार झालेल्या दहशतीचा तो साक्षीदार होता. समाज अस्वस्थ होता. टेलिव्हिजनवर सतत येणाऱ्या बातम्या, देशभरात सुरुं झालेली आंदोलनं, राजकीय वाद-चर्चा असं बरंच काही त्याला आणखी अस्वस्थ करून गेलं. यातूनच ‘कयो कयो कलर’ (२०२३) ची कल्पना सुचली. शाहरुखनं सिनेमाचं शिक्षण घेतलेलं नाही. त्याची वैचारीक बैठक वाचनातून तयार झालेली आहे. आपल्याला जे काही करायचं, दाखवायचंय यासाठी ते थेट न सांगता सबटेक्स्टचा वापर करण्यावर त्याचा भर आहे. सततच्या दहशतीमुळं मुस्लिम समाजात एक साचलेपण आहे. ते सहज दिसत नाही ते रुटीनमध्ये परावर्तीत झालंय. ‘दुनिया में आए है तो जिना ही पडेगा’ असं म्हणत फक्त जगायचंय. शाहरुखला रुटीनच्या रहाटगाड्यात अडकलेला निम्न-मध्यमवर्गीय मुस्लिम समाज त्याला दाखवायचा होता. ते दाखवताना तो जसा आहे तसाच दाखवला गेला पाहिजे यावर त्यानं भर दिला.

नरेंद्र बंडबे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’साठी मतदान करणार; आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून निवड झालेले मराठीतील एकमेव चित्रपट समीक्षक

रझाकला नोकरी करायची नाही तर त्याला स्वत:ची रिक्षा खरेदी करायची आहे. बायको, दोन मुलं यांच्यासोबत तो कालूपूरमध्ये राहतो. जवळच त्याचे आई-वडील ही राहतात. काही अंतरावर बहीण राहते. या सर्वांचं रुटीन सिनेमात येते. संवाद रोजचेच. रोजच्याच समस्या. हे सर्व दाखवण्यासाठी त्यानं स्टॅटीक फ्रेमचा (स्थिर चित्रण) वापर केलाय. हे स्थिर चित्रण हलत्या कॅमेऱ्यापेक्षा जास्त प्रभावी झालंय. प्रेक्षक म्हणून आपण रझाकच्या कुटुंबात नक्की काय चाललंय यात डोकवायला भाग पाडतो आणि त्यांच्या परिस्थिती अडकत जातो. अगदी ‘स्लाईस ऑफ लाईफ फिलींग’ देणारा हा सिनेमा आहे.

सिनेमाचं कथानक प्रामुख्यानं तीन ठिकाणी घडतं. रझाकचं राहतं घर, त्याच्या अम्मी-अब्बूचं घर आणि बहिणीचं घर. या तिन्ही ठिकाणची स्थिती दाखवण्यासाठी कॅमेऱ्याची विशिष्ट मांडणी केलेली आहे. रझाकच्या घरातला कॅमेरा हा तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी टिपतोय. दाटी-वाटीत राहणाऱ्या या कुटुंबाचा प्रमुख स्वप्न पाहतोय. नोकरी करायची नाही म्हणतो, त्यातून बायकोसोबत वाद घालतो, हातातोडाची मारामारी आहे, मुलांचं शिक्षण आहे, असं बरंच काही घडतं कॅमेरा हे सर्व टिपतो. रझाकच्या अम्मी-अब्बूच्या घरात काहीच घडत नाही. त्या वयात आहे ते टिकवून ठेवण्याची आणि टिकून राहण्याची प्रक्रिया असते. त्यामुळं हा हँडहेल्ड कॅमेरा हलत असला तरी त्या घरातला लोकांच्या परिस्थितीत काहीच फरक पडणार नाहीय याची सतत जाणीव करुन देतो. तिसरं ठिकाण रझाकच्या बहिणीचं घर. तिची परिस्थीती रझाकपेक्षा जरा बरी आहे. सुखवस्तू आहे. अम्मी आल्यावर तिच्याशी रझाकच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलण्याची संधी ही बहीण सोडत नाही. या दोघींच्या संवादात २००२ दंगलीपासूनचे संदर्भ येतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संदर्भ येतात. यात रझाक आपलं कुटुंब कसं चालवेल ही चिंता असते.

‘कयो कयो कलर’ (२०२३) ची भाषा अस्सल सिनेमॅटीक आहे. इराणी सिनेमांचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. इराणचे दिग्दर्शक अब्बास किओरोस्तमी, जाफर पनाही, माजिद माजिदी यांची आठवण करुन देते. त्याच्या सिनेमात इराणमधल्या समाज आहे तसा दाखवण्यासाठी केलेला कॅमेऱ्याचा कल्पक वापर ‘कयो कयो कलर’मध्ये दिसतो. शाहरुख हे मान्य ही करतो. किओरोस्तोमी, पनाही आणि माजिदी या तिघांनी लहान मुलांच्या माध्यमातून इराणच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. शाहरुखच्या ‘कयो कयो कलर’मधली लहान मुलंही तशीच आहेत. जगण्याच्या रहाटगाड्यात त्याचं बालपण हरवलंय. त्याचं रुटीन पाहताना प्रेक्षकाला अस्वस्थ व्हायला होतं. गुजरातमधला मुस्लीम, त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्यांची स्वप्न आणि २०१६ची नोटबंदी अशी गोष्ट लहानमुलांच्या नजरेतून घडताना दिसते. दहशत, आर्थिक तंगी यामुळं लहान मुलांमध्ये अकाली प्रौढत्व येतं. हे असं त्याचं मोठं होणं विचार करायला लावणारं आहे. ‘कयो कयो कलर’ (२०२३)मधल्या लहान मुलांच्या बाबतीत ते जरा जास्त आहे. वस्तीत ‘कयो कयो कलर’ हा खेळ खेळत असताना ते जाणवतं. जगण्याचा खेळ खेळताना जिंदगी त्यांना आपले वेगवेगळे रंग दाखवते. हेच शाहरुखला दाखवून द्यायचंय.रॉटरडम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशा वेगळ्या विषयांवरच्या सिनेमाची रेलचेल असते. यात ‘कयो कयो कलर’ फिट बसला.

शूटींगचे आठ महिने आणि त्यानंतर जवळपास पोस्ट प्रॉडक्शनचं वर्षभर असं जवळपास दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ‘कयो कयो कलर’ तयार झाला. शाहरुखशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तो एक संवेदनशील दिग्दर्शक आहे. आसपासच्या घटनांबद्दल तो सतत विचार करतो. वाचन आणि त्यावर चिंतन केल्यानं विचारांची प्रगल्भता आहे. त्याला जागतिक सिनेमाची जोड मिळालेय. त्याच्यासाठी सिनेमा हा फक्त मनोरंजनाचा विषय नाही, तर तो आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींना दाखवण्याचं एक माध्यम आहे. ‘कयो कयो कलर’च्या बाबतीत त्यानं सिनेमा माध्यमाचा पुरेपूर वापर करून घेतलाय. अगदी काही लांखांमध्ये बनलेला हा सिनेमा करोडोंची फिलींग आणि मनाला अस्वस्थ आणि त्याचवेळी माणूस म्हणून समृध्द करून जातो.