गणेश जयंती २०२३ : भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक काय आहे ? माघी गणेश जयंतीचे वैशिष्ट्य काय ? कोणत्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला ? भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच गणेश चतुर्थी का साजरी करतात ? या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे. या कथांच्या आधारे गणेश चतुर्थी विषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…


गणेश चतुर्थी का साजरी का करतात ?

गणेश पुराण हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितली. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपतीसंदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत. गणेश पुराणानुसार, एक गरीब क्षत्रिय होता. त्याने कुटुंबपोषणासाठी अनेक व्यवसाय केले. पण, त्याला द्रव्यप्राप्ती काही होईना. शेवटी संसाराला कंटाळून तो रानात गेला. तिथे त्याला सौभरी ऋषींचे दर्शन झाले. त्याला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणपतीची आराधना करण्यास सांगितले. त्याने त्याप्रमाणे करताच त्याला संपदा प्राप्त झाली. पुढील जन्मी तो कर्दम नावाचा ऋषी झाला. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. गणेश गीतेनुसार (गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय १३८-१४७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाची वाहन-आयुधयुक्त मूर्ती तयार करून तिची विधियुक्त पूजा करील आणि सात वेळा गणेशगीता वाचेल त्याला सर्व सुख-संपत्ती मिळेल.

हेही वाचा : हरतालिका म्हणजे काय ? हरतालिकेची ‘ही’ कथा तुम्हाला माहीत आहे का ?


भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात. अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादित केलेल्या श्रीगणेश कोशानुसार, गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी, असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. ही पार्थिव गणेश पूजा दिवस म्हणजे आपण आज साजरी करत असणारी गणेश चतुर्थी होय. या चतुर्थीला गणपतीची षोडषोपचारांनी पूजा करायची असते.

हेही वाचा : चांगला नवरा मिळवण्यासाठी उपवास का ?


गणेश जयंती का साजरी करतात ?

माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी ‘ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते.
या संदर्भांचा आधार घेता असे लक्षात येते की, गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरेतर व्रत आहे. परंतु, सध्या सणांचे होणारे आधुनिकीकरण मूळ संदर्भ विसरतात. आणि गणेश चतुर्थी हा श्रीगणेशाचा जन्म समजतात.
(संदर्भ : गणेश पुराण)

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When was ganpati born know the difference between ganesh jayanti and ganesh chaturthi vvk