उद्या गणेश चतुर्थी. गणपतीची षोडशोपचाराने पूजा करण्यात येते. गणपतीच्या या पूजेमध्ये २१ प्रकारच्या पत्रींचा समावेश करण्यात येतो. यातील तीन पत्री या गणेशाला सदैव प्रिय आहेत. दुर्वा-शमी आणि मंदार. गणपती म्हटला की सर्वांना दुर्वांची आठवण येतेच. शमी तर गणपतीच्या पूजेमध्ये कायम असते. मग, गणपतीचा आणि या पत्रींचा संबंध काय आहे ? गणपतीला दुर्वा-शमी का वाहतात ? हे गणेशपुराणाच्या आधारे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणपती बाप्पा म्हटला की, अगदी लहान मूलसुद्धा जास्वंद, दुर्वा आणून देते. गणपतीला शमी वाहण्याची तर परंपरा आहेच. एकवीस दुर्वांची जुडी करून गणपतीला वाहतात. गणेशाची पूजा करतानाही अभिषेकासाठी दुर्वा वापरतात. दुर्वासुद्धा तीन पान असणाऱ्याच वापरतात. त्याला दुर्वांकुर असेही म्हणतात. गाणपत्य संप्रदायातील काही व्रतांमध्ये शमीची १२१ पाने वाहण्याला विशेष महत्त्व आहे. गणपतीला दुर्वा-शमी आणि मंदार का प्रिय आहेत, याबाबत अनेक कथा आहेत. गणेश पुराणातही विविध कथा सांगितल्या आहेत. यातील महत्त्वाच्या तीन कथा बघूया…

हेही वाचा : गणपतीचा जन्म कधी झाला ? जाणून घ्या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक….

गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत ?

दुर्वा ही साक्षात ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली एक देवता आहे. तिने तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि गणपतीला प्रिय ठरली. कालांतराने तिला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. पार्वतीने तिला तृणरूपात पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. पुढे तप करून तिने त्या शापातून मुक्ती मिळवली. ती अंश रूपाने पृथ्वीवर पृथ्वीवर राहून गणेशाच्या पूजेमध्ये आवश्यक बनली. अजून एका कथेनुसार गणपतीला पोटदुखीचा भयंकर त्रास होऊ लागला. कोणत्याच उपायाने पोटदुखी कमी होईना. तेव्हा दुर्वांचा रस गणपतीला देण्यात आला. दुर्वांच्या रसामुळे गणपतीला बरे वाटले. प्रसन्न होऊन गणपतीने वर मागण्यास सांगितले. तेव्हा दुर्वाने गणपतीच्या पूजेत तिचे अढळस्थान मागितले. गणपतीने तथास्तु म्हटले. यामुळे गणपतीच्या पूजेत तिला महत्त्वाचे स्थान आहे.

हेही वाचा : शास्त्रीय गणेशमूर्ती कशी असावी ? गणेशमूर्तींचे स्वरूप कसे असावे ? काय सांगते अथर्वशीर्ष…

शमी-मंदार यांची कथा…

और्व ऋषीला शमिका नावाची मुलगी होती. धौम्य ऋषींचा पुत्र मंदार हिच्याशी तिचा विवाह झाला. त्यांच्या आश्रमात भृशुंडी ऋषी आले असता, त्यांचे भव्य पोट आणि स्थूलपणा बघून ते दोघे हसले. तेव्हा भ्रुशुंडींनी त्यांना वृक्षरूपात जन्म घ्याल असा शाप दिला. त्याप्रमाणे ते दोघे शमी आणि मंदार वृक्षांमध्ये जन्माला आले. मंदार यांचे गुरु शौनक आणि शमीचे वडील और्व यांनी त्यांची अशी दशा पाहिली. त्यांनी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तप आरंभिले. श्रीगणेश प्रसन्न झाले. त्यांनी शमी आणि मंदार यांना पूर्वदेह प्राप्त व्हावा, अशी विनंती केली. गणपतीने सांगितले की, भ्रुशुंडींचा शाप खोटा ठरणार नाही. आजपासून मी मंदार वृक्षाच्या पायाशी वास कारेन आणि मला शमीपत्रे प्रिय होतील. म्हणून मंदार वृक्षाच्या पायाशी गणपती मूर्ती स्थापन करतात आणि शमीपत्रे वाहतात.

गणपतीला वाहण्यात येणाऱ्या प्रत्येक पत्रीमागे एक आख्यायिका आहेत. पांढरे फूल गणपतीला फक्त गणेश चतुर्थीलाच वाहतात. अन्य दिवशी पांढरे फूल वाहत नाहीत. गणेश पुराणामध्ये या आख्यायिका दिलेल्या आहेत.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why durva shami and mandar are dear to shri ganesha what is the relationship between ganpati and patri vvk