Naga panchami special 2023 :श्रावण हा सणांचा राजा. श्रावण सुरु झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो, नागपंचमी. आज नाग देवतेची चित्रे काढून, त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायांमध्ये नाग देवतेला महत्त्व आहे. नाग ही सृजनात्मक देवता आहे, असे समजले जाते. महाराष्ट्र प्रांतात अनेक महिला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात. किंवा ज्यांना भाऊ असेल त्या महिला विशेषत्वाने हा उपवास करतात. नागपंचमीला भावाचा उपवास का करतात, पंचमीलाच नागपंचमी का साजरी करतात, नागपंचमीसंदर्भात कोणत्या आख्यायिका आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. श्रावणात शिवपूजनाला खूप महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रतांप्रमाणे श्रावणात सण-उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी नवनागांचे स्मरण केले जाते.
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।। नवनागस्तोत्र
म्हणजेच अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची रोज आराधना करावी. यामुळे सर्पभय राहत नाही, तसेच विषबाधा होत नाही.

सापांची उत्पत्ती कशी झाली?

भविष्य पुराणानुसार, महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या. त्यापैकी एकाचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विनीता. एकदा महर्षि कश्यप यांनी कद्रूच्या पत्नीवर प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे सापांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी ऋषी कश्यपची दुसरी पत्नी विनीता. पक्षीराज गरुडाची माता झाला. कद्रू आणि विनीता यांच्यात नेहमी ईर्षा असायची. त्यामुळे नाग आणि गरुड यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले. आजही नाग आणि गरुड एकमेकांचे शत्रू समजले जातात.

पंचमी तिथी रोजी नागपंचमी का साजरी करतात ?

भविष्यपुराणानुसार, एका गुन्ह्यामुळे नागपुत्राला शाप मिळाला. त्या शापानुसार सर्पमेध यज्ञामध्ये अनेक नाग मृत्युमुखी पडतील असे भाकीत करण्यात आले होते. शाप मिळाल्यावर नागपुत्र दु:खी झाला. तेव्हा वासुकी नागपुत्रातर्फे ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने काळजी न करण्याचे आश्वासन दिले आणि ते म्हणाले, ”तुला जरतकरू ही बहीण असेल, तिचा विवाह ऋषीमुनींशी होईल. या दोघांपासून अस्तिक नावाचा पुत्र होईल. तो हा यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल. ते ऐकून नागाला खूप आनंद झाला. शाप फलद्रुप होण्याची वेळ आल्यावर राजा परीक्षिताचा नागादंशाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जनमेजयाने सर्प मेध यज्ञाचे आयोजन केले.या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून राख झाले. तेव्हा अस्तिक मुनी तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्प यज्ञ थांबवून नागांवर थंड दूध ओतले. त्यामुळे सापांच्या अंगाला गारवा तर मिळालाच, सोबतच भात ही ठेवला. अस्तिक मुनींच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने सापांना जीवन दिले ती तिथी पंचमी होती. म्हणून नागपंचमी ही पंचमीला साजरी करतात असे म्हटले जाते. तसेच कोकणात साप-नाग दिसल्यावर अस्तिक अस्तिक कालभैरव म्हणण्याची प्रथा आहे. यामुळे साप त्रास देत नाही, अशी श्रद्धा आहे. अस्तिक मुनींचे नाव घेतल्यामुळे साप शांत होतात असा हा समज आहे.

नागपंचमीचा उपवास का केला जातो?

असे म्हटले जाते की, सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता. त्याचे नाव सत्येश्वर असे होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा आकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. अन्नत्याग केल्यानंतर सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या.


नागपंचमीची आख्यायिका

एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

२१ व्या युगातील नागपंचमी

विज्ञानाच्या आधारे संशोधनानंतर असे सत्य पुढे आले आहे की, नागाला दूध अपायकारक ठरते. म्हणून नागपंचमीला नागाला दूध पाजू नये. विज्ञानाप्रमाणेच धर्मदेखील सत्याची नेहमीच पाठराखण करीत आला आहे. पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच समाजप्रबोधनासाठी नागपंचमी ह्या सणाचा एक प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे. ‘नागाची पूजा करणे’ या विधीमागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे, हा हेतू आहे.

साप-नाग यांना न मारता स्वतः जगा आणि इतरांना जगूद्या या तत्त्वाचा वापर करत त्यांना जीवन द्यावे. सापांविषयी योग्य जागृतता निर्माण करावी हेच या नागपंचमीचे फळ ठरेल.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why fast on nagpanchami how did snakes originate what are legends vvk
Show comments