गेल्या पाच वर्षात मुंबईची लोकसंख्या साडेचार लाखाने वाढली असली तरी सुमारे ११ लाख मतदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे हे घटलेले मतदार कोणाच्या पथ्यावर पडतात याकडे लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या २२७ वॉर्डासाठी २२७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईची सध्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी आहे. तर मतदार संख्या ९१ लाख ८० हजार ४९७ आहे त्यात पुरूषांची संख्या ५० लाख ३० हजार ३६३ तर स्त्रीयांची संख्या ४५ लाख ६६ हजार २७३ आहे. मागील पाच वर्षात म्हणजेच २०१२ मध्ये हीच लोकसंख्या १ कोटी १९ लाख ७८ हजार ४५० इतकी होती. गेल्या पाच वर्षात साधारण ४ लाख ६३ हजार ९२३ इतकी लोकसंख्या वाढली आहे. मात्र मतदार संख्या ११ लाख ६ हजार ८२ इतकी घटली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी बोगस मतदानाच्या तक्रारी पुढे आल्याने निवडणूक आयोगाकडून बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये सर्वेक्षण करून निवडणूक आयोगाकडून मुंबईतील ११ लाख नावे रितसर कमी करण्यात आली. ही नावं मतदार यादीत बोगस ठरत असल्याचे पुढे आल्याने आयोगाकडून संबंधित मतदारांना आपल्या माहितीची आणि नाव नोंदणीसाठीची मुदत देखील देण्यात आली होती. पण संबंधितांकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर निवडणूक आयोगाने रितसर नावे कमी केली होती. मात्र, मतदारांना आज मतदान करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतचा खुलासा देण्यात आला असला तरी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून स्थायिक असतानाही मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याने नागरिक संतापले आहेत. गेल्या पाच वर्षात मराठी माणूस मुंबईतून स्थलांरीत झाला असून, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आदी परिसरात विसावला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घटलेल्या मतदारांमध्ये मराठी टक्का मतदार किती आहे हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे घटलेल्या मतांचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होतो हे २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. नवीन वॉर्ड पुनर्रचनेत शहरातील सात वॉर्ड कमी झाले आणि त्यापैकी पाच पश्चिम उपनगरात, तर दोन पूर्व उपनगरांमध्ये वाढले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहर आणि उपनगरांमधील लोकसंख्येत झालेल्या चढ-उतारामुळे वॉर्डात फेरबदल झाले आहे. पूर्वीचे ३० ते ३५ हजार मतदारांचे वॉर्ड आता ५४ हजारापर्यंत वाढले आहेत. वार्डाच्या फेररचनेमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून त्याचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे.