लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

Jio hikes tariffs by 12-25% effective July 3: मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने येत्या ३ जुलैपासून मोबाइल सेवांच्या दरांत १२ ते २७ टक्क्यांच्या घसघशीत वाढीची गुरुवारी घोषणा केली. बुधवारी पार पडलेल्या स्पेक्ट्रम लिलावानंतर, सर्वच प्रमुख कंपन्यांकडून दूरसंचार सेवांच्या दरात वाढ अपेक्षिली जात होती, त्याची सुरुवात ‘जिओ’कडून झाली.

सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर जिओने मोबाइल सेवांच्या दरांमध्ये वाढ केल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. नवीन योजना आणणे हे उद्योगातील नावीन्यपूर्णतेला चालना देण्याच्या दिशेने आणि ५जी आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे शाश्वत वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले.

जिओने जवळपास सर्व वैधता कालावधीच्या योजनांवरील मोबाइल सेवांचे दर वाढवले आहेत. सर्वात कमी रिचार्जची किंमत आता २७ टक्क्यांनी वाढून १९ रुपये करण्यात आली आहे, त्यासाठी आधी १५ रुपये आकारले जात होते. ७५ जीबी डेटा पोस्टपेड प्लॅनची किंमत आता ३९९ रुपयांच्या तुलनेत ४४९ होणार आहे. तसेच जिओने ८४ दिवसांच्या वैधतेसह ६६६ रुपयांच्या लोकप्रिय अमर्यादित प्लॅनची किंमतदेखील सुमारे २० टक्क्यांनी वाढवून ७९९ रुपये केली आहे. वार्षिक रिचार्ज प्लॅनच्या किमती १,५५९ रुपयांवरून १,८९९ रुपयांपर्यंत आणि २,९९९ रुपयांवरून ३,५९९ रुपयांपर्यंत म्हणजेच २० ते २१ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>परदेशस्थ भारतीयांकडून १०७ अब्ज डॉलरचे निधी हस्तांतरण; थेट विदेशी गुंतवणुकीच्या दुप्पट ओघ

सुरू होईल दरवाढीची मालिकाच…

आता जिओपाठोपाठ दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांकडूनदेखील दरवाढीचा कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या अव्वल दोन कंपन्यांचा या क्षेत्राच्या ७८ टक्के बाजारपेठेवर नियंत्रण आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरील व तुलनेत खूप छोट्या असलेल्या व्होडाफोन आयडियाने ताज्या लिलावात सर्वाधिक ३,५१०.४० कोटी रुपये स्पेक्ट्रम खरेदीवर खर्च केले आहेत. लिलावातील बोलीवर कंपन्यांनी केलेला खर्च आता दरवाढीतून ग्राहकांकडून वसूल केला जाईल.