मुंबईः संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत आणि दुबई मॉल तसेच बुर्ज खलिफा सारख्या जगप्रसिद्ध मनोऱ्याच्या निर्मितीसाठी ओळख असलेल्या एम्मारने, मुंबई व लगतच्या परिसराकडे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासह पहिल्यांदाच लक्ष वळविले आहे. येत्या सहा वर्षात या बाजारपेठेत २,००० कोटींच्या गुंतवणुकीच्या योजनेसह, पुनर्विकास प्रकल्पांसह, मध्यम व उच्च आलिशान निवासी प्रकल्पांच्या संधींचा शोध घेतला जात असल्याचे कंपनीने सोमवारी येथे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ

जवळपास दोन दशकांपासून भारतात कार्यरत एम्मार इंडियाने मुंबईलगत अलिबाग येथे ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘कासा वेनेरो’ हा ८४ आलिशान बंगल्यांच्या विविध सुविधांनी सुसज्ज हॉलिडे होम प्रकल्पाची घोषणा केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील मालमत्ता विकसनापासून आजवर दूर राहण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नव्हते, असे एम्मार इंडियाचे मुख्य कार्यकारी कल्याण चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. या महानगराचे विशेष सामर्थ्य असून, देशातील सर्वात सखोल आणि मजबूत स्थावर मालमत्ता बाजारपेठ म्हणून जगाच्या आकर्षणाचाही तो बिंदू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या शहरात जागेची चणचण आहे हे वास्तव लक्षात घेऊन, स्थापित गृहनिर्माण संस्थांचे पुनर्वसन अथवा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पाच्या संधींसाठी देखील कंपनीची तयारी असल्याचे चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> वस्त्रोद्योगात ९५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित; पीएलआय’मुळे परदेशी गुंतवणूकदारांतही वाढते आकर्षण

पुढील सहा वर्षांत देशभरात एकंदर १.८५ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात साधारण १५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना कंपनीने आखली आहे. मुख्यतः उत्तर भारतात दिल्ली, गुरग्राम, एनसीआर, मोहाली, इंदूर आणि हैदराबाद अशा शहरांत कंपनीकडून सध्या ८० लाख चौरस फूट क्षेत्रफळाची वाणिज्य व निवासी प्रकल्पांचे विकसनाचे काम सुरू आहे.