Anil Agarwal Success Story : एखादी गोष्ट सुरू करण्याचं वय नसतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं. तुम्ही आयुष्यात कोणत्याही गोष्टीला कधीही सुरुवात करू शकता. यशासाठी कोणतीही कालमर्यादा नसली तरी तुम्हाला लवकर यश मिळेल या भ्रमात कधी राहू नका, पण त्यामुळे निराश होऊ नका. काही लोकांना पटकन यश मिळते, तर काही लोकांना यश मिळण्यासाठी खूप अथक प्रयत्न करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यात एका व्यक्तीनं ९ वेळा अपयशी होऊनही जिंकण्याची जिद्द सोडली नाही. मेटल किंग असलेले दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल यांची ही कहाणी आहे. अनिल अग्रवाल यांनी स्वतःच ट्विटवर त्यांची कहाणी शेअर केली आहे.
वेदांता ग्रुपचे चेअरमन पहिला प्रश्न विचारतात, यशस्वी होण्यासाठी टाइमलाइन आहे का? मग ते स्वतःच सांगतात, अजिबात नाही. ते पुढे लिहितात, मला वाटतं की, आपल्या समाजातून आजच्या तरुणांवर खूप दडपण आहे की, त्यांनी लवकरात लवकर आपल्या करिअरमध्ये प्रगती केली पाहिजे. मी अशा अनेक तरुणांशी बोललो ज्यांना यशाची गाडी चुकण्याची भीती वाटते, तो ३० वर्षांचा होण्याआधी स्वतःला यशस्वी सिद्ध करू शकेल का?, हाच विचार त्यांच्यावर थोपवण्यात येतो.
हेही वाचाः येत्या ५ वर्षांत निफ्टी आणि सेन्सेक्स दुप्पट होणार; ‘मोतीलाल’चे रामदेव अग्रवाल यांचं सूचक विधान
”मी आयुष्यात अनेक अपयश पाहिलेत”
अग्रवाल सांगतात की, त्यांना आयुष्यात अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. मी आयुष्यात अनेक अपयश पाहिले आहेत, एकदा नाही, दोनदा नाही तर ९ वेळा, त्यामुळे मी ते समजू शकतो. मला अनेकदा निराशेचा सामना करावा लागला, माझ्या कल्पना नाकारल्या गेल्या, खरं तर त्या कल्पना माझ्या दृष्टीने सर्वोत्तम विचार होत्या. बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कारखान्यांमध्ये रात्रभर जागून मी दुसऱ्या दिवसाचा विचार करत असायचो. २० आणि ३० च्या वयात मी खूप संघर्ष केला. नंतर चाळिशीत आलो होतो. या वयात मला खूप अनुभव आला होता आणि माझ्या डोक्यावर केसही कमी राहिले होते. ज्या वेळी सर्वांना वाटले की मी हार मानली, तेव्हा वयाच्या चाळिसाव्या वर्षी मी पहिल्यांदा यशाची चव चाखली. ज्या कल्पना एकेकाळी फेटाळल्या जात होत्या, त्याच विचारांचे आता कौतुक होत आहे.
हेही वाचाः ६.५ कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएफ खात्यावर जमा होणार ८.१५ टक्के व्याजदर
”अजून बरंच करणं बाकी आहे”
अग्रवाल यांच्या मते, जीवनाचा सार म्हणजे तुमचा स्वत:च्या विचारावर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. पराभवाला नेहमीच विजयाची पायरी समजा. ससा आणि कासवाची गोष्ट आठवते? तुम्ही हळू चालत असलात तरी सातत्यपूर्ण चालत राहिल्यास तुम्ही शर्यत जिंकू शकता. तुम्ही वय वर्षे ३० पूर्ण होण्याआधीच यशस्वी होण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रवास अजून खूप दूर आहे.