लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बँक खाती आणि त्यामाध्यातून केल्या जाणाऱ्या बँकिंग व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल परिसंस्थेमुळे बँकिंग व्यवहार काही क्षणात करता येणे शक्य झाले आहे. मात्र आर्थिक साक्षरतेचा अभाव, तंत्रज्ञान विषयक माहिती आणि ज्ञानाचा अभाव यामुळे सामान्य ग्राहकांसाठी बँकिंगचे व्यवहार गुंतागुंतीचे बनले आहे. देशातील बँक कर्मचाऱ्यांची सगळ्यात जुनी आणि मोठी संघटना असलेल्या ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’च्या (एआयबीईए) माध्यमातून विनामूल्य ‘बँक क्लिनिक’ सेवा सुरू करण्यात आली आहे.

बँकेच्या ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवणे, तंत्रज्ञानाची माहिती अवगत करणे ही आजची सगळ्यात मोठी गरज निर्माण झाली आहे. यासाठी बँकांकडून प्रयत्न केले जात असले तरी, अजूनही त्यात कमतरता राहत असल्याने १ जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०२३ या ९ वर्षांच्या कालावधीत बँक ग्राहकांना विविध कारणास्तव ४.६९ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

हेही वाचा – गणेश ग्रीन भारतची शुक्रवारपासून प्रत्येकी १८१ ते १९० रुपयांनी भागविक्री

हेही वाचा – जूनमध्ये सेवा क्षेत्राच्या कामगिरीत विस्तार

देशात सध्या १३९ वाणिज्य बँकांच्या १,५६,९५१ शाखांमार्फत ३०० कोटी ठेवी खाती आणि ४० कोटी कर्ज खाती हाताळली जातात. यातील ५२.५० कोटी खाती ही जनधन योजनेखाली उघडण्यात आली आहेत. ज्यात २.३० लाख कोटी ठेवी आहेत. शिवाय या बँकांनी आपल्या खातेदारांना ९६.९४ कोटी डेबिट कार्ड, १०.२५ कोटी क्रेडिट कार्ड वाटली आहेत. २० लाख बँक मित्र ग्राहकांना बँकिंग सेवा देतात. तर यूपीआयच्या माध्यमातून ३१.९५ कोटी ऑनलाईन व्यवहार पार पडतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँकिंग सेवा वापरल्या जात असल्याने बँकिंग प्रणालीवर बऱ्याचदा ताण येतो. ग्राहकांना देखील अडचणी येत असल्याने ग्राहकांची हीच आश्यकता हेरून ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’च्या वतीने ही विनामूल्य सेवा देण्यात येणार असून त्यामाध्यमातून बँक ग्राहकांना माहिती आणि विविध बँकिंग सेवांबाबत मार्गदर्शन-सल्ला देण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे एआयबीईए संघटनेच्या वतीने संयुक्त सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली. बँकेच्या ग्राहकांना banksclinic.com या संकेतस्थळावर याबाबत माहिती मिळणार आहे.