मुंबई : भांडवली बाजारात ‘टी+१’ व्यवहार प्रणालीकडे संक्रमणाचा म्हणजेच व्यवहार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हिशेबपूर्तीच्या (सेटलमेंट) गतिमान पर्यायाची अंमलबजावणी येत्या २७ जानेवारीपासून होणार आहे. सध्या भांडवली बाजारात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. चीनच्या भांडवली बाजारानंतर ‘टी+१’ व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी करणारा भारत हा दुसरा देश ठरणार आहे.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने समभाग खरेदी-विक्री व्यवहार झाला तो दिवस अधिक एका (टी १) दिवसात विकलेल्या समभागांची रोख रक्कम बँक खात्यात अथवा खरेदी केलेले समभाग डिमॅट खात्यात जमा होऊन हिशेबाच्या पूर्ततेच्या पद्धतीचा पर्याय मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. त्याची २५ फेब्रुवारी २०२२ पासून अंबलबजावणी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला तळातील १०० कंपन्यांसाठी सर्वप्रथम ही पद्धत लागू करण्यात आली. त्यांनतर २५ मार्च २०२२ पासून टप्प्याटप्प्याने तळातील ५०० कंपन्यांना ‘टी+१’ पद्धत लागू झाली. त्यापुढील दर महिन्याला अजून ५०० कंपन्यांना या पद्धतीखाली आणण्यात आले. आता राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या सर्व समभागांसाठी ‘टी+१’ व्यवहार प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
हेही वाचा – जगातील प्रत्येक चौथ्या आयफोनची निर्मिती भारतातून होईल – पीयूष गोयल
‘टी+१’ प्रणाली म्हणजे काय?
भांडवली बाजारात सध्या टी २ अर्थात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. म्हणजेच समभाग खरेदी केले तर दोन कामकाज दिवसांनंतर ते ‘डिमॅट’ खात्यात जमा केले जातात आणि समभाग विकले असतील तर दोन दिवसांनंतर रोख रक्कम खात्यात जमा होतात. प्रस्तावित ‘टी+१’ मुळे या सर्व प्रक्रियेतील एक दिवस कमी होणार आहे. देशात १९९६ पासून डी-मॅट खात्याची सुविधा सुरू झाली त्यावेळी ‘टी +५’ व्यवहार प्रणाली अस्तित्वात आली. एप्रिल २००२ पासून ‘टी+३’ आणि एप्रिल २००३ पासून ‘टी +२’ ही पद्धत आणण्यात आली. सुमारे २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधींनतर आता ‘टी+१’ व्यवहार प्रणाली लागू करण्यात आली आहे.