ग्राहकांचा खर्च आणि अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्यामुळे लवकरच नोकऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. क्रेडिट कार्ड विक्री, वैयक्तिक वित्त, बँकिंगमधील किरकोळ विमा, वित्तीय सेवा आणि विमा म्हणजेच BFSI क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात नोकर भरती होण्याचा अंदाज आहे. टीमलीजच्या अहवालानुसार, २०२३ च्या उत्तरार्धात सुमारे ५०,००० तात्पुरत्या स्वरूपातील नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
बीएफएसआय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केल्यास सणासुदीच्या काळात बँकिंगमध्ये तात्पुरत्या कामगारांची मागणी वाढणार आहे. तसेच ही भरती केवळ अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या टियर- १ शहरांमध्येच नाही, तर कोची, मदुराई, लखनऊ, चंदीगड, अमृतसर, भोपाळ, रायपूर या टियर-२ आणि टियर-३ मध्येही ही भरती केली जाणार आहे.
येत्या ६ महिन्यांत नोकऱ्या मिळणार
टीमलीज सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड-BFSI कृष्णेंदू चॅटर्जी म्हणाले की, क्रेडिट कार्ड व्यवहार वाढत असताना पर्सनल फायनान्स अॅप्लिकेशनही वाढत आहेत आणि भारताची डिजिटल पेमेंटची परिस्थितीतही भरभराट होत आहे, बऱ्याच जणांना एक गतिमान नोकरी हवी असते. गेल्या दोन महिन्यांत बाजारात आम्ही तात्पुरत्या कर्मचार्यांच्या पोस्टसाठी अंदाजे २५,००० नोकऱ्यांच्या संधी निर्माण झालेल्या पाहिल्या आहेत आणि येत्या काही महिन्यांत ही संख्या आणखी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. या सणासुदीच्या काळात वाढलेल्या ग्राहक हालचालींची पूर्तता करण्यासाठी BFSI क्षेत्रातील भरतीमध्ये वाढ होत आहे, असंही अहवालात पुढे नमूद केले आहे.
हेही वाचाः आता सिमकार्डची पडताळणी न केल्यास १० लाखांचा दंड ठोठावला जाणार, मोदी सरकारने नियम बदलले
किती पगार मिळणार?
तसेच या पदांवरील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. टीमलीजच्या अहवालानुसार, दिल्लीमध्ये २०,००० ते २२,००० रुपये, कोलकातामध्ये १६,००० ते १८,००० रुपये, मुंबईमध्ये २०,००० ते २२,००० रुपये, चेन्नईमध्ये १८,००० ते २०,००० रुपये आणि बंगळुरूमध्ये २०,००० ते २२,००० रुपयांचे ऑन-द-फीट पोस्टसाठी पॅकेज मिळणार आहे.
कामगारांची गरज कशी असणार?
चॅटर्जी म्हणाले की, सणासुदीच्या काळात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी कुशल आणि ग्राहक केंद्रित कर्मचार्यांच्या शोधात असते. वेळेचे व्यवस्थापन आणि उच्च स्तरीय ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. कंपनीच्या यशात आणि ग्राहकांच्या समाधानात या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचं योगदान असणार आहे. सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि विमा उत्पादनांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.