नवी दिल्ली : परदेशातील भारतीयांनी मायदेशातील त्यांच्या स्वकीयांना धाडलेल्या निधीने अर्थात ’रेमिटन्स’ने सलग दुसऱ्या वर्षी १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात तो १०७ अब्ज डॉलरवर गेला आहे. उल्लेखनीय म्हणजे याच सालात देशात आलेल्या ५४ अब्ज डॉलरच्या थेट परदेशी गुंतवणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

हेही वाचा >>> क्वांट म्युच्युअल फंडाच्या योजनांतून १,३९८ कोटींचे निर्गमन

परदेशस्थ नागरिकांकडून सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. १९९० पासून भारतातून उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये माहिती-तंत्रज्ञान (आयटी) व्यावसायिकांच्या स्थलांतरामुळे हा कल दोन दशकांहून अधिक काळ टिकून आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, खासगी हस्तांतरण म्हणून परदेशस्थ भारतीयांकडून झालेले एकूण निधी हस्तांतरण (रेमिटन्स) ११९ अब्ज डॉलरच्या घरात जाणारे आहे. परदेशस्थांच्या उत्पन्नाची परतफेड आणि इतर संबंधित खर्चाचा भाग वगळल्यानंतर, निव्वळ निधी हस्तांतरणाची रक्कम १०७ अब्ज डॉलर इतकी आहे.

हेही वाचा >>> स्पेक्ट्रम लिलावाच्या दुसऱ्या दिवशी ११,३०० कोटींची बोली

आधीच्या वर्षात म्हणजे वर्ष २०२२-२३ मध्ये रेमिटन्सच्या माध्यमातून भारताला १२५ अब्ज डॉलर, त्यानंतर मेक्सिको ६७ अब्ज डॉलर, चीन ५० अब्ज डॉलर, फिलिपिन्स ४० अब्ज डॉलर आणि इजिप्तला २४ अब्ज डॉलर प्राप्त झाले होते.

अमेरिकेतून सर्वाधिक प्रवाह रिझर्व्ह बँकेने करोनाच्या महासाथीनंतर ‘रेमिटन्स’वर केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत स्थायिक भारतीयांचे यात सर्वाधिक योगदान राहिले आहे. जे एकूण रेमिटन्स रकमेच्या २३ टक्के आहे. या कालावधीत आखाती देशांमधून निधी हस्तांतरणात मात्र घट झाली आहे. तेथून बहुतांश निधी अकुशल कामगारांकडून भारतात राहणाऱ्या स्वकीयांच्या उदरनिर्वाहासाठी धाडला जातो.