मुंबई : देशातील आयुर्विमा क्षेत्राने ऑगस्ट २०२३ मधील ३०,७१६ कोटींच्या तुलनेत सरलेल्या सप्टेंबर २०२४ मध्ये ३५,०२० कोटी रुपये पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न संकलित केले. वार्षिक तुलनेत त्यात सुमारे १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. नवीन हप्त्यापोटी उत्पन्नांत ‘एलआयसी’चा वाटा २०,३६९ कोटींचा अर्थात ५८ टक्के आहे. मागील वर्षातील याच महिन्यातील ५९ टक्क्यांवरून त्यात किंचित घसरण झाली आहे.

विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत आयुर्विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्याच्या संकलनात १९ टक्क्यांनी वाढ झाली असून ते १,८९,२१४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १,५८,३७७ कोटी रुपये होते. ग्राहकांमध्ये विम्याबाबत जागरूकता वाढत असून, विमा खरेदीला प्राधान्य मिळत असल्याचे यातून स्पष्ट होते. नवीन विमा योजना खरेदीत वार्षिक आधारावर ४५.४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यमान वर्षात ३२,१७,८८० विमा योजनांची विक्री झाली आहे. जी गेल्या वर्षी २२,११,६८० नोंदवली गेली होती.

हेही वाचा :प्रत्यक्ष कर संकलन १८ टक्के वाढीसह ११.२५ लाख कोटींवर

सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला सप्टेंबर २०२४ मध्ये नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्यापोटी २०,३६९ कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एलआयसीने १८,१२६ कोटी रुपये मिळवले होते. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहामाही संकलनात एकत्रितपणे १२ टक्क्यांनी वाढ झाली असून ते ७३,६६४ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच महिन्यात ६५,७३४ कोटी रुपये होते.

हेही वाचा : Gold Silver Rate Today : दसऱ्याच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

भारतातील आयुर्विमा उद्योग नवनव्या जनविभागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून लक्षणीय प्रगती करत आहे. खासगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात बाजारसंलग्न विमा योजनांचा (युलिप) वाटा अधिक आहे. तर एलआयसी पारंपरिक विमा योजनांवर अबलंबून आहे. सध्या एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ आणि आयसीआयसीआय लाइफ यांसारख्या खासगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होत आहे.