लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांच्या बाजार पदार्पणाच्या किमतीवर ९० टक्के नियंत्रण मर्यादा लागू केली आहे. एसएमई कंपन्यांच्या समभागांना सूचिबद्धतेला मिळत असलेल्या लक्षणीय आणि अवाजवी अधिमूल्याच्या पार्श्वभूमीवर नियामकांचे हे प्रतिबंधात्मक पाऊल आहे. एसएमई मंचावर प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून सूचिबद्ध झाल्यानंतर प्री-ओपन सत्रादरम्यान सुरुवातीची किंमत म्हणजेच समभागाच्या बाजार पदार्पणाची किंमत नियंत्रित करण्यासाठी, ९० टक्क्यांची कमाल किंमत मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुरुवातीच्या प्री-ओपन सत्रात समभाग आयपीओ किमतीच्या तुलनेत जास्तीतजास्त ९० टक्क्यांपर्यंतच वधारू शकणार आहे. अशा आशयाचे परिपत्रक एनएसईने गुरुवारी जारी केले आणि तात्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही म्हटले आहे. एसएमई मंचावर सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांचे नियमन व देखरेख त्या त्या शेअर बाजाराकडून होत असते. हेही वाचा >>>ॲमेझॉन शेअर्सचा विक्रमी उच्चांक, जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस विकणार कोट्यवधींचे शेअर्स! ही ९० टक्के किंमत नियंत्रण मर्यादा केवळ एसएमई मंचावर सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांसाठी लागू करण्यात आली असून मुख्य बाजार मंचावर सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांसाठी ती नसेल, असे एनएसईने स्पष्ट केले आहे. सध्याच्या एसएमई कंपन्यांच्या समभागांमध्ये काही गुंतवणूकदारांकडून संशयास्पद हेराफेरी, किमतींमध्ये फेरफार आणि उन्माद लक्षात घेता असा निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते. ‘एसएमई आयपीओ’तील अनिर्बंध तेजीबाबत विद्यमान वर्षात मार्चमध्ये ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी चिंता व्यक्त केली होती. परताव्याचे लक्षणीय प्रमाण पाहता, सावधगिरी म्हणून बाजार नियामक ‘सेबी’ तसेच बाजार मंचांनीही सूचिबद्ध एसएमई कंपन्यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायांतर्गत (एएसएम) आणि ट्रेड फॉर ट्रेड (टीएफटी) उपायांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला होता. विक्रमी गुंतवणूक, अधिमूल्यही वारेमाप ० विक्रमी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या २०२३ मध्ये ‘बीएसई एसएमई’ आणि ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावरून विक्रमी १७६ कंपन्यांनी ‘आयपीओ’द्वारे ४,८४२ कोटी रुपये उभे केले. ० कंपन्यांना या माध्यमातून केवळ ४,८४२ कोटी रुपये उभारणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडे २.८ लाख कोटी मूल्याच्या समभागांची मागणी करणारे अर्ज दाखल झाले. ० २०२४ मध्ये आजवर दोन्ही बाजारमंचांवर सुमारे १२० कंपन्या एसएमई विभागात सूचीबद्ध झाल्या. यापैकी, सुमारे ३५ कंपन्यांनी ९९ टक्के ते ४१५ टक्क्यांच्या श्रेणीत सूचीबद्धता अर्थात पदार्पणाच्या दिवशी समभाग अधिमूल्य वाढल्याचा फायदा पाहिला.