बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो लिमिटेडच्या सहकार्याने बजाज ऑटोच्या वाळूज (औरंगाबाद) येथील प्रकल्पाच्या परिसरात रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेंतर्गत (RBIOS) कार्यक्रम राबवण्यात आला आहे. फसवणुकीबाबत जागरूकता आणि आर्थिक साक्षरतेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत आयोजन करण्यात आलं होतं. १९ आणि २० ऑक्टोबर २०२३ या दोन दिवस हा कार्यक्रम चालला.

भारतीय स्टेट बँकचे (SBI) असंख्य कर्मचारी आणि सुमारे ३०० उत्साही सहभागींनी या शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सामान्य नागरिकासाठी एक अपरिहार्य उपयुक्त आणि मदतरुपी घटक ठरलेल्या रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल योजनेच्या यशावर कार्यक्रमात भर दिला. तसेच रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल योजनेंतर्गत तक्रार दाखल करण्याची सोपी आणि विनामूल्य प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. सर्वसामान्य व्यक्तीला बँकेच्या सेवांसंदर्भात cms.rbi.org.in या संकेतस्थळावर आपली तक्रार ऑनलाइन दाखल करता येते, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचाः Money Mantra : एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे अनोखी गुंतवणूक योजना; गुंतवणूकदारांबरोबरच पर्यावरणासाठी ठरणार फायदेशीर

ज्या समस्यांचे निराकरण बँका किंवा इतर नियमनांतर्गत येणाऱ्या कंपन्याकडे ग्राहकाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यास अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आरबीआयची एकात्मिक लोकपाल योजना (RBIOS) ही एक मुक्त, जलद, निःपक्षपाती आणि कार्यक्षम यंत्रणा म्हणून काम करते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांना त्यांच्या बँक खात्यातील घडामोडी आणि व्यवहारांवर एसएमएसद्वारे सतत लक्ष ठेवण्याचे त्याचबरोबर अनधिकृत व्यवहारांबाबत त्यांच्या संबंधित बँकांकडे त्वरित तक्रार करून सतर्क राहण्याचे आवाहनही तज्ज्ञांनी केले.

हेही वाचाः Gold Price Hike : ६ महिन्यांत तस्करीच्या सोन्याच्या जप्तीत ४३ टक्क्यांची वाढ, ‘या’ कारणांमुळे तस्करी वाढली

कार्ड हरवल्यास किंवा एखाद्या प्रसंगात माहितीत फेरफार झाल्यास संभाव्य नुकसान टाळण्यासाठी क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही क्रमांकासारखी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील, ओळख (आयडी), वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन), किंवा वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती अन्य कोणालाही देऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. विशेषत: फोनवर या माहितीची विचारणा करणाऱ्या ठग अथवा तिऱ्हाईत व्यक्तीला तर अजिबात माहिती न देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच लॉटरी जिंकल्याबद्दल किंवा सोडतीबद्दल एसएमएस किंवा ईमेल पाठविणाऱ्यांना अजिबात कोणतेही पैसे हस्तांतरित करु नये, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकपाल मुंबई, बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो लिमिटेड या तिघांमधील सहकार्य सार्वजनिक जागरूकता, आर्थिक साक्षरता आणि फसवणूक रोखण्याबाबत त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. आपल्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याबरोबरच बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींना सक्षम व साक्षर बनवण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

डिजिटल वॉलेट्स, प्रीपेड पेमेंट सुविधा, मोबाईल बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग संबंधित तक्रारी, व्यापाऱ्यांनी क्रेडिट न देणे आदी प्रकरणांसह अपूर्ण/अयशस्वी/अनधिकृत व्यवहारांसाठी परतावा मिळण्यासाठी आणि अन्य बऱ्याच आर्थिक बाबींबाबत रिझर्व्ह बँकेच्या लोकपालांकडे ऑनलाइन पोर्टलद्वारे आपल्या तक्रारी नोंदविण्यास सहभागी सदस्यांना यावेळी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

Story img Loader