मुंबई: एनव्हीडिया कॉर्पने अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजशी कृत्रिम प्रज्ञा (एआय) संगणकीय पायाभूत सुविधा तसेच भारतात नवोपक्रम केंद्र उभारण्यासाठी करार केला आहे, असे एआय चिप निर्मिती क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीच्या प्रमुखांनी गुरुवारी सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीज उभारणी करत असलेल्या नवीन विदा प्रकल्पात एनव्हीडिया निर्मित ब्लॅकवेल एआय चिप वापरात येणार आहे. एनव्हीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग सध्या दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून, गुरुवारी त्यांनी ‘एनव्हीडिया एआय समिट’साठी उपस्थित मुकेश अंबानी यांची भेट घेतली. एनव्हीडियाची भारत सहा ठिकाणी उपस्थिती असून ही अमेरिकी कंपनी फर्म एंटरप्राइजेस, क्लाउड आणि नवउद्यमींसह (स्टार्टअप) कृत्रिम प्रज्ञेसंबंधित पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कार्य करते. ज्यामध्ये सर्वात प्रगत हजारो ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट, उच्च-कार्यक्षमता नेटवर्किंग आणि एआय सॉफ्टवेअर मंच आणि साधनांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ‘सिरमा’चा रांजणगावमध्ये उत्पादन प्रकल्प

एनव्हीडिया एआय समिटमध्ये, अंबानी आणि हुआंग यांनी एआयमधील भारताची परिवर्तनशील क्षमता आणि या क्षेत्रातील उभरते जागतिक नेतृत्व म्हणून उदयोन्मुख भूमिका यावर चर्चा केली. रिलायन्स आणि एनव्हीडियामधील भागीदारीचे उद्दिष्ट देशात एक मजबूत एआयमधील पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. ज्यामुळे जागतिक बुद्धिमत्ता बाजारपेठेत भारताला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल.

हेही वाचा >>> युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड; मुंबईतील शाखेतील संशयास्पद व्यवहारांच्या देखरेखीत अपयशाचा ठपका

भारताची सुरुवात एनव्हीडियाकडे असलेल्या सर्वोत्कृष्टतेने होईल. भारत एका नवीन बुद्धिमत्ता युगाच्या उंबरठ्यावर आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील आपल्या कामगिरीने जगाला आश्चर्यचकित करेल. शिवाय एआयसारखे नवीन तंत्रज्ञान आणि लोकांच्या आकांक्षा भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देतील. तर रिलायन्स-एनव्हीडियाच्या भागीदारीतून भारतातील ग्राहकांसाठी अनुकूल विशेष उपयोजन (ॲप्लिकेशन्स) तयार करण्यात येतील, असे हुआंग यांनी सांगितले. उभयतांकडून भागीदारीबद्दल अधिक मात्र तपशील देण्यात आला नाही.

देशातून ‘एआय’ निर्यात शक्य

भारताच्या संगणकीय क्षमतांमध्ये २० पटीने वाढ २०२४ सालात दिसून येईल आणि देशातून लवकरच परिणामकारक कृत्रिम प्रज्ञा (एआय) उपायांची जगभराला निर्यातही शक्य होईल, असे जेन्सेन हुआंग म्हणाले. भारतातील एनव्हीडियाच्या परिसंस्थेचाचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जगातील संगणक उद्योगासाठी भारत अत्यंत पसंतीचे ठिकाण आहे, जगातील प्रत्येक कंपनीच्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या केंद्रस्थानी तो आहे, असे ते म्हणाले.